

अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगली नोकरी मिळावी, अशी प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा असते. मात्र सध्याच्या स्पर्धात्मक रोजगार बाजारात अनेक तरुणांना पदवी मिळूनही नोकरीसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशीच एक पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर व्हायरल झाली असून एका फ्रेशर इंजिनिअरने नोकरीच्या शोधातील आपला अनुभव मांडत अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पोस्टमध्ये संबंधित तरुणाने आपण 2026 बॅचचा बीटेक पदवीधर असल्याचे सांगितले आहे. शिक्षण पूर्ण होताच त्याने नोकरीचा शोध सुरू केला. गेल्या महिनाभरात त्याने सुमारे 500 कंपन्यांमध्ये अर्ज केल्याचा दावा केला आहे. त्यासाठी केवळ एका जॉब पोर्टलवर अवलंबून न राहता लिंक्डइन, कंपन्यांच्या अधिकृत करिअर वेबसाइट्स आणि विविध रोजगार पोर्टल्सचा वापर केला. मात्र एवढे प्रयत्न करूनही त्याला एकाही कंपनीकडून मुलाखतीसाठी कॉल आला नसल्याचे त्याने नमूद केले.
या तरुणाच्या मते, अनेक कंपन्यांनी अर्ज स्वीकारल्यानंतर कोणताही प्रतिसाद दिला नाही. मुलाखतीसाठी बोलावणे तर दूरच, पण अर्ज का नाकारला गेला याची माहितीही देण्यात आली नाही. अशा परिस्थितीत उमेदवारांचा आत्मविश्वास कमी होणे स्वाभाविक असल्याचे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्याने स्पष्ट केले की, सध्या त्याचा भर मोठ्या पगारावर नसून काम शिकण्याची आणि उद्योग क्षेत्राचा अनुभव मिळवण्याची संधी मिळावी, हीच त्याची प्राथमिकता आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील जवळपास कोणत्याही भूमिकेसाठी तो तयार असल्याचेही त्याने नमूद केले.
ही पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. अनेक फ्रेशर आणि नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांनी आपणही अशाच परिस्थितीतून जात असल्याचे सांगितले. काहींनी रोजगार बाजारातील वाढती स्पर्धा आणि मर्यादित संधी याकडे लक्ष वेधले.
एका नेटकऱ्याने लिहिले की, त्याला मुलाखतीसाठी कॉल येतात; मात्र अंतिम फेरीत जाऊनही निवड होत नाही. वारंवार होणाऱ्या नकारामुळे मानसिक ताण वाढत असल्याचे त्याने सांगितले. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने कंपन्यांनी अर्ज नाकारताना कारणही सांगत नसल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळे स्वतःतील उणिवा नेमक्या कोणत्या आहेत, हे उमेदवारांना समजत नसल्याचे त्याचे मत होते.
ही पोस्ट केवळ एका तरुणाची कहाणी नसून सध्याच्या रोजगार बाजारातील वास्तव अधोरेखित करणारी असल्याचे अनेकांचे मत आहे. चांगली शैक्षणिक पात्रता असूनही अनुभवाच्या अभावामुळे किंवा तीव्र स्पर्धेमुळे अनेक फ्रेशर उमेदवारांना पहिली संधी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे कंपन्यांनी निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता ठेवावी आणि उमेदवारांना आवश्यक अभिप्राय द्यावा, अशी मागणीही सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.