
Sikandar Raza Record: झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रजा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर रजाने श्रीलंकेला धूळ चारली, आणि त्याचबरोबर अनेक दिग्गज खेळाडूंचे विक्रमही मोडीत काढले. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे झिम्बाब्वेने मालिकेत बरोबरी साधली आहे.
दरम्यान, या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. झिम्बाब्वेच्या (Zimbabwe) गोलंदाजांनी श्रीलंकन फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिले नाही. संपूर्ण 20 षटकेही न खेळता श्रीलंकेचा संघ 17.4 षटकांत अवघ्या 80 धावांवर गारद झाला. टी-20 फॉरमॅटमधील श्रीलंकेचा हा दुसरा सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी, जून 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ते 77 धावांवर ऑलआऊट झाले होते. श्रीलंकेच्या फलंदाजीत कामिल मिशारा (20), कर्णधार चरिथ असालंका (18) आणि दसुन शनाका (15) वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही, जे त्यांच्या लाजिरवाण्या कामगिरीचे द्योतक आहे.
श्रीलंकेला (Sri Lanka) 80 धावांवर रोखण्यात झिम्बाब्वेचा कर्णधार आणि फिरकीपटू सिकंदर रजा याचा सिंहाचा वाटा होता. त्याने त्याच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 11 धावा देत 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. रजाने कामिंदू मेंडिस, श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असालंका आणि दुष्मंथा चमीरा यांना तंबूत पाठवले. श्रीलंकेविरुद्ध टी-20 सामन्यांमधील झिम्बाब्वेच्या कोणत्याही गोलंदाजाची ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. याच उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीर (Player of the Match) म्हणून निवडण्यात आले.
हा पुरस्कार स्वीकारताना रजाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18व्यांदा त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू बनला. या यादीत त्याने भारताचा सूर्यकुमार यादवला (16) मागे टाकले आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर मलेशियाचा वीरनदीप सिंग आहे, ज्याने आतापर्यंत 22 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
इतकंच नाही तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिकंदर रजाला 32वा सामनावीर पुरस्कार मिळाला. यासोबतच त्याने सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे. त्याचबरोबर, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1347 विकेट्स घेणाऱ्या श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाचीही बरोबरी केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 664 सामन्यांमध्ये 76 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आहे, ज्याने 69 वेळा हा पुरस्कार पटकावला आहे.
सिकंदर रजाची गेल्या काही वर्षांतील कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे. तो फलंदाजी, गोलंदाजी आणि नेतृत्व या तिन्ही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळेच झिम्बाब्वेसारख्या संघाला मोठ्या संघांना टक्कर देणे शक्य झाले आहे. आतापर्यंतच्या कामगिरीवरुन असे दिसते की, सिकंदर रजा हा येणाऱ्या काळात आणखी काही विक्रम मोडीत काढू शकतो आणि क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरु शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.