

१३ नोव्हेंबर २०१४ - भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर त्या दिवशी रोहित शर्माने अविश्वसनीय कामगिरी केली. श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात त्याने २६४ धावा करून इतिहास घडवला. आज त्या घटनेला पूर्ण १० वर्षे झाली आहेत, पण त्याचा विक्रम अजूनही अभेद्य आहे.
त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. सुरुवातीला रोहितचा डाव सावध होता. परंतु लय सापडताच त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर अक्षरशः हल्ला चढवला. ईडन गार्डन्सचा प्रत्येक कोपरा “हिटमॅन, हिटमॅन!” या घोषणांनी दुमदुमला.
रोहितने १७३ चेंडूत ३३ चौकार आणि ९ षटकार ठोकले. त्याच्या खेळात अचूक टायमिंग, प्रचंड शक्ती आणि जबरदस्त आत्मविश्वास दिसून आला.
या सामन्यानंतर रोहित शर्मा "हिटमॅन" या टोपणनावाने जगभर ओळखला जाऊ लागला. संयम, तंत्र आणि आक्रमकतेची सांगड घालणारा तो फलंदाज आजही व्हाईट-बॉल क्रिकेटचा अधिराजाच मानला जातो.
याच डावानंतर त्याने पुढे दोन आणखी द्विशतके झळकावली. एकदिवसीय क्रिकेटमधील हा पराक्रम करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
रोहितच्या वादळी खेळीमुळे भारताने ५० षटकांत ५ बाद ४०४ धावांचा प्रचंड डोंगर उभा केला. श्रीलंकेचे गोलंदाज नुवान कुलसेकरा, अँजेलो मॅथ्यूज, अथवा थिसारा परेरा कोणीच त्याला रोखू शकले नाहीत. श्रीलंकेचा संघ प्रत्युत्तरात ४३.१ षटकांत फक्त २५१ धावांवर गारद झाला आणि भारताने सामना १५३ धावांनी जिंकला.
आज, १० वर्षांनंतरही रोहित शर्माचा २६४ धावांचा विक्रम मोडणारा कोणी नाही. एकदिवसीय सामन्यांमध्ये इतकी मोठी वैयक्तिक धावसंख्या आजही “अभेद्य” ठरली आहे.
चाहत्यांच्या स्मरणात आजही तो दिवस ताजा आहे. जेव्हा “शर्मा जी का बेटा” ईडन गार्डन्सवर वादळासारखा कोसळला आणि भारतीय क्रिकेटला नवा अध्याय दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.