

Prithviraj Chavan Statement : व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकन सैन्याने ताब्यात घेऊन अमेरिकेत नेल्याच्या घटनेने जगभरात खळबळ उडाली. या प्रकरणावरुन आता भारतातील राजकारणही तापले असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले. अमेरिकेच्या या कृतीवर भारताने कोणतीही ठाम भूमिका घेतली नसल्याबद्दल चव्हाणांनी चिंता व्यक्त केली असून, "अशी घटना उद्या भारतासोबतही घडू शकते," असा इशारा त्यांनी दिला.
मंगळवारी (6 जानेवारी) प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "व्हेनेझुएलामध्ये जे काही घडले आहे, ते संयुक्त राष्ट्राच्या चार्टरच्या पूर्णपणे विरोधात आहे. एका लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षाला दुसऱ्या देशाच्या सैन्याने त्यांच्याच देशात घुसून अपहरण करणे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. ही प्रवृत्ती अशीच राहिली तर उद्या जगातील कोणत्याही देशासोबत अगदी भारतासोबतही असे घडू शकते. मात्र, केंद्र सरकार अमेरिकेच्या (America) या दादागिरीवर मौन बाळगून आहे."
चव्हाण यांनी भारत (India) सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना रशिया आणि चीनचे उदाहरण दिले. "रशिया आणि चीनने या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेत अमेरिकेच्या कृतीची कठोर शब्दांत निंदा केली. मात्र, भारत नेहमीप्रमाणे 'मध्यम मार्ग' स्वीकारत आहे. युक्रेन युद्ध असो किंवा इस्रायल-हमास संघर्ष, भारताने कधीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. आता तर आपण अमेरिकेला इतके घाबरलो आहोत की, या आंतरराष्ट्रीय गुन्ह्याची साधी टीका करण्याचीही हिंमत सरकार दाखवू शकत नाहीये," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन अमेरिकेला नेल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक सावध प्रतिक्रिया दिली होती. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, "व्हेनेझुएलातील सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून आम्ही त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. सर्व पक्षांनी चर्चेद्वारे आणि शांततापूर्ण मार्गाने यावर तोडगा काढावा, जेणेकरुन या क्षेत्रात स्थिरता राहील." या मर्यादित भूमिकेवरच चव्हाण यांनी निशाणा साधला.
चव्हाण यांनी केंद्र सरकारला घेरण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' बाबत केलेल्या विधानामुळे ते भाजपच्या निशाण्यावर आले होते. पाकिस्तानविरोधातील या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी भारत हरला आणि चार दिवसांच्या संघर्षात भारतीय विमाने पाडली गेली, असा दावा चव्हाणांनी केला होता. त्यांच्या या विधानावरुन भाजपने त्यांच्यावर 'देशविरोधी' आणि 'पाकिस्तानची भाषा बोलणारे' अशी टीका केली होती. आता पुन्हा एकदा अमेरिकेवरुन भारताला इशारा दिल्याने नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काराकास (वेनेझुएलाची राजधानी) येथील भारतीय दूतावास तेथील भारतीय समुदायाच्या संपर्कात असून, त्यांना सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, जागतिक स्तरावर महासत्ता असलेल्या अमेरिकेने एका सार्वभौम देशाच्या प्रमुखाला ज्या प्रकारे उचलले, त्यावरून आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका काय असावी, यावर आता देशांतर्गत मंथन सुरू झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.