

Delhi Blast: जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्लीतील दहशतवादी कटाचा पर्दाफाश एका आश्चर्यकारक पद्धतीने झाल्याचे स्पष्ट केले. एका संतापलेल्या तरुणीने तिच्या पूर्व प्रियकराविषयी पोलिसांकडे तक्रार दिल्याने हा कट उघडकीस आला, असे अब्दुल्ला यांनी सांगितले. हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिटच्या 23व्या आवृत्तीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही बाब उघड केली. ही परिस्थिती देशातील गंभीर सुरक्षा त्रुटी दर्शवते, असे त्यांनी मत व्यक्त केले. आपल्याला या संशयितांविषयी कोणतीही पूर्व माहिती मिळाली नव्हती, असेही ते म्हणाले.
अब्दुल्ला यांनी केंद्रशासित प्रदेशाच्या मॉडेलवर टीका करताना सरकारे एकमेकांपासून वेगळे राहून काम करु शकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. अब्दुल्ला म्हणाले, "दिल्लीतील स्फोटाबद्दल मी वृत्तपत्रात वाचले. हा हल्ला कोणी केला... किंवा तपास कसा सुरु आहे, याबद्दल मला कोणतीही माहिती नव्हती."
'गल्लीतील चर्चांमधून' माहिती मिळाल्याचे अब्दुलांनी सांगितले. ते म्हणाले की, दिल्लीतील दहशतवादी कट उघडकीस येण्याचे खरे कारण म्हणजे एका संतापलेल्या तरुणीने आपल्या पूर्व प्रियकराविषयी पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीमुळेच तपास यंत्रणांना एका नेटवर्कचा माग लागला आणि अखेरीस या कटात सामील असलेल्या एका डॉक्टरांपर्यंत पोहोचता आले.
अब्दुल्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, "अशा प्रकारची माहिती इतर कोणत्याही मुख्यमंत्र्याला सुरक्षा यंत्रणांकडून अधिकृतरित्या दिली जाईल. पण मला ती गल्लीतील चर्चेतून मिळाली. इथे केंद्रशासित प्रदेशाचे मॉडेल काम करु शकत नाही." 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या या दहशतवादी घटनेत 15 लोक मारले गेले, तर अनेक जण जखमी झाले. तपास यंत्रणांनी यानंतर देशभरातील अनेक डॉक्टर सामील असलेल्या एका व्हाईट-कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला.
या स्फोटानंतर ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. कोणताही धर्म इतक्या क्रूरतेने निष्पाप लोकांची हत्या करण्याचे समर्थन करत नाही, असे त्यांनी म्हटले होते.
या घटनेनंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते, "आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक रहिवासी दहशतवादी किंवा दहशतवाद्यांशी जोडलेला नाही. हे केवळ काही लोक आहेत, ज्यांनी नेहमीच येथील शांतता भंग केली. जेव्हा आपण जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक रहिवासी आणि प्रत्येक काश्मिरी मुस्लिमाकडे एकाच विचारधारेतून पाहतो आणि प्रत्येकाला दहशतवादी मानतो, तेव्हा लोकांना योग्य मार्गावर ठेवणे कठीण होते."
मुख्यमंत्री असतानाही त्यांना दहशतवादी कटाची माहिती वृत्तपत्रातून मिळाल्याची त्यांची कबुली आणि एका अनधिकृत तक्रारीमुळे कट उघडकीस आल्याची बाब भारतातील सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय आणि गुप्तचर माहितीतील त्रुटींवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.