

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या रोमांचक सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी जेमिमा रॉड्रिग्ज ही सामन्याची हिरो ठरली. तिच्या नाबाद १२७ धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने विजय मिळवला. सामन्यानंतर जेमिमा अत्यंत भावनिक झाली आणि तिने तिच्या मानसिक संघर्षाबद्दल खुलासा केला.
सामन्यानंतर बोलताना जेमिमा म्हणाली, “या विश्वचषकात माझी सुरुवात चांगली झाली नव्हती. मी सतत दबावाखाली होते. त्यामुळे मी दररोज रडायचे, मला मानसिकदृष्ट्या बरे वाटत नव्हते. मी चिंतेशी झुंज देत होते. पण मला माहीत होते की देव माझ्या सोबत आहे आणि मी हार मानू शकत नाही.”
ती पुढे म्हणाली, “मैदानावर उतरल्यानंतर मी स्वतःशी सतत बोलत होते. मी बायबलमधील एक वचन पुन्हा पुन्हा आठवत राहिले ‘शांत राहा आणि देव तुमच्यासाठी लढेल.’ आणि खरोखरच देवाने माझ्यासाठी लढा दिला.”
सामन्यानंतर जेमिमा तिच्या कुटुंबाला भेटली तेव्हा ती अश्रूंनी भरून आली. या क्षणी बोलताना ती म्हणाली, “मी सर्वप्रथम देवाचे आभार मानते, कारण मी हे एकटी करू शकले नसते. माझ्या आई-वडिलांनी, प्रशिक्षकांनी आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाने मला या काळात आधार दिला. गेले चार महिने खूप कठीण गेले, पण आज सगळं स्वप्नासारखं वाटतं आहे.”
जेमिमाच्या या ऐतिहासिक खेळीने आणि तिच्या भावनिक शब्दांनी लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. भारताने आता विश्वविजेतेपदाच्या दिशेने मोठी झेप घेतली असून संपूर्ण देशाचे लक्ष अंतिम सामन्याकडे लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.