
Indian Football Teams Historic Win: भारतीय फुटबॉल संघाने मोठी कमाल केली. क्रिकेट आणि हॉकीच्या यशानंतर आता भारतीय फुटबॉल टीमनेही आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. CAFA नेशन्स कप 2025 च्या स्पर्धेत भारताने कांस्यपदक (Bronze Medal) जिंकले. भारताने आपल्यापेक्षा खूप वरच्या रँक असलेल्या ओमानच्या (Oman) संघाला पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 असे नमवून हा ऐतिहासिक विजय मिळवला.
सोमवार, 8 सप्टेंबर रोजी ताजिकिस्तानच्या हिसोर सेंट्रल स्टेडियममध्ये भारत (India) आणि ओमान यांच्यात तिसऱ्या स्थानासाठी सामना झाला. भारतासाठी हा सामना एका मोठ्या आव्हानासारखा होता, कारण गेल्या 31 वर्षांच्या इतिहासात भारताला ओमानविरुद्ध कधीही विजय मिळवता आला नव्हता. याआधी दोन्ही संघांमध्ये एकूण 10 सामने झाले होते, ज्यात ओमानने 7 सामने जिंकले होते, तर 3 सामने ड्रॉ झाले होते. इतकंच नाही, तर फिफा (FIFA) क्रमवारीतही ओमान (79) भारतापेक्षा (133) 54 स्थानांनी पुढे आहे.
काही आठवड्यांपूर्वीच भारतीय संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेले खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने हा विजय मिळवला. आय-लीग आणि आयएसएल (ISL) मध्ये आपले कौशल्य दाखवलेल्या या 'देसी' प्रशिक्षकाने ओमानसारख्या बलाढ्य संघालाही पराभूत करण्याची रणनीती आखली.
सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही, त्यामुळे दुसरा हाफ निर्णायक ठरला. 55व्या मिनिटाला ओमानने पहिला गोल करत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. भारताचा पराभव निश्चित वाटत असतानाच, 81व्या मिनिटाला उदंता सिंहने अप्रतिम गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. संपूर्ण 90 मिनिटांच्या खेळात निकाल न लागल्याने सामना एक्स्ट्रा टाइममध्ये गेला, पण तिथेही 30 मिनिटांत कोणताही संघ गोल करु शकला नाही.
अखेरीस, सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटद्वारे लावण्यात आला. तिथे भारतीय संघाचा स्टार गोलकीपर गुरप्रीत सिंग संधू याने उत्कृष्ट कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. भारताने 5 पैकी 3 पेनल्टी शॉट्स गोलमध्ये बदलले, तर ओमानला त्यांच्या सुरुवातीच्या 4 पेनल्टीमध्येच गोल करता आला. पाचव्या पेनल्टीवर ओमानकडे बरोबरी करण्याची संधी होती, पण गुरप्रीतने तो शॉट रोखून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
गेल्या दोन वर्षांपासून भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी निराशाजनक होती. विदेशी प्रशिक्षकांनाही फारसे यश मिळाले नव्हते, त्यामुळे भारतीय फुटबॉल महासंघाने खालिद जमील यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्या आगमनानंतर भारतीय संघाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा दिसून आली.
ताजिकिस्तानमध्ये झालेल्या या CAFA नेशन्स कपमध्ये भारताला पहिल्यांदाच आमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेत भारताने पहिल्याच सामन्यात यजमान ताजिकिस्तानला 2-1 असे हरवून दमदार सुरुवात केली. त्यानंतर, स्पर्धेतील सर्वात मजबूत आणि जागतिक क्रमवारीत 20व्या स्थानावर असलेल्या इराणविरुद्धही भारताने कडवी झुंज दिली. भारताने 70व्या मिनिटापर्यंत सामन्याचा स्कोर 0-0 असा राखला होता, पण त्यानंतर इराणने आपल्या अनुभवाच्या जोरावर 3-0 असा विजय मिळवला. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारतासाठी निराशाजनक ठरला आणि तो 0-0 असा ड्रॉ राहिला.
हा कांस्यपदकाचा विजय भारतीय फुटबॉलसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे यश संघाचा आत्मविश्वास वाढवणारे असून, आगामी स्पर्धांसाठी एक नवी आशा निर्माण करणारे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.