
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असून, हल्ला - प्रतिहल्ला याचे सत्र सुरुच आहे. पाकिस्तानकडून शनिवारी रात्री भारतातील २६ ठिकाणांवर हल्ला केला. यात पाकिस्तानने भारतीय एअरबेस देखील टार्गेट करण्याचा प्रयत्न केला.
नागरी वस्तीतील नुकसान वगळता सर्व भारतीय एअरबेस सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानच्या ८ एअरबेस आणि लष्करी तळ टार्गेट केल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, ले. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी माध्यमांना माहिती दिली.
"पाकिस्तानकडून पश्चिम भागात हल्ले सुरुच ठेवले. हल्ले करण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोन, लाँग रेंज वेपन, लढाईचे विमान वापरुन भारतीय सेनेच्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. आंतरराष्ट्रीय सीमेवरील श्रीनगर ते नलियापर्यंत २६ ठिकाणांवर हल्ला करण्यात आला, भारतीय सेनेने यातील अनेक हल्ले निष्क्रीय केले. तरी देखील पठाणकोट, उधमपूर, आदमपूर, भुज आणि भटींडा येथील ठिकाणांवर हल्ला केला", अशी माहिती ले. कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.
पाकिस्तानने हायस्पीड मिसाईलच्या मदतीने पंजाब येथील एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. श्रीनगर, अवंतीपुरा आणि उधमपूर येथील आरोग्य केंद्रावर देखील पाकिस्तानने हल्ला केला. भारताने देखील या जोरदार प्रत्युत्तर दिल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली. भारतीय मिलिटरी स्टेशनचे नुकसान केल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचे कुरेशी यावेळी म्हणाल्या. देशातील सर्व एअरबेस सुरक्षित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यासंबधित व्हिडिओ देखील यावेळी माध्यमांना दाखवण्यात आला.
प्रवासी विमानांच्या आडून पाकिस्तान नापाक कारवाई करत असल्याचे देखील कुरेश यांनी स्पष्ट केले. भारताने कमांड आणि कंट्रोल केंद्रांना लक्ष्य केले. भारताने पाकिस्तानी मिलिटरी बेस रफिकी, मुरिद, चकलाला, रहिमयार खान, सुकूर आणि चुनीयन येथे हल्ला केला. याशिवाय पसरुर येथील रडार साईट आणि सियालकोट येथील एअरबेसवर देखील हल्ला करण्यात आल्याची माहिती कुरेश यांनी दिली. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तर दाखल भारताने पाकिस्तानच्या ठराविक मिलिटरी स्टेशन्सवर हल्ला केल्याची माहिती विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली.
"भारतीय सैन्याने दहशतवादी लाँचपॅड उद्ध्वस्त केले. ८ आणि ९ मे २०२५ च्या रात्री जम्मू आणि काश्मीर आणि पंजाबमधील अनेक शहरांमध्ये पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यांच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्याने दहशतवादी लाँचपॅडवर गोळीबार करत उध्वस्त केले. नियंत्रण रेषेजवळ असलेले हे दहशतवादी लाँचपॅड पूर्वी भारतीय नागरिक आणि सुरक्षा दलांविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे केंद्र होते. भारतीय सैन्याच्या जलद आणि निर्णायक कारवाईमुळे दहशतवादी पायाभूत सुविधा आणि क्षमतांना मोठा धक्का बसला आहे", असे भारतीय लष्कराने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.