

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका भारताने २-१ अशी जिंकत कसोटीतील पराभवाचा वचपा काढला असला, तरी या विजयानंतर टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नियमभंगप्रकरणी भारतीय संघावर दंड ठोठावला आहे. मालिकेतील एका सामन्यात ‘स्लो ओव्हर रेट’ राखण्यात अपयश आल्यामुळे संपूर्ण संघाची १० टक्के मॅच फी कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
३ डिसेंबर २०२५ रोजी रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ही चूक घडली. आयसीसीच्या एलिट पॅनेल मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी या सामन्यात भारताने निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याचे स्पष्ट केले. नियमांनुसार, प्रत्येक कमी पडलेल्या षटकासाठी संघावर ५% मॅच फीचा दंड आकारला जातो. या सामन्यात भारताने दोन षटके वेळेत न टाकल्यामुळे एकूण १०% मॅच फी कापण्यात आली आहे.
कर्णधार केएल राहुलने या निर्णयाला आव्हान न देता दोष मान्य केला आहे. स्लो ओव्हर रेटसारख्या चुकांबाबत भारतीय संघ सामान्यतः सतर्क असतो, मात्र या सामन्यात वेळेच्या नियोजनात अडचणी आल्याने संघाला हा फटका बसला. याचा थेट परिणाम खेळाडूंच्या मानधनावर झाला असून, आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
दरम्यान, मैदानावर मात्र भारताने दमदार कामगिरी करून ही मालिका आपल्या नावावर केली. पहिला सामना रांची येथे खेळला गेला, जिथे भारताने १७ धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात रायपूर येथे दक्षिण आफ्रिकेने ३५९ धावांचे मोठे लक्ष्य चार विकेट्स राखून पार पाडत सामना जिंकला. त्यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत आली होती.
निर्णायक तिसरा सामना विशाखापट्टणम येथे झाला, जिथे भारतीय संघाने भक्कम कामगिरी करत ९ विकेट्सने मोठा विजय मिळवला आणि मालिका २-१ अशी खिशात टाकली. आता दोन्ही संघांमध्ये सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, टीम इंडिया नव्या जोमाने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.