

Himachal Pradesh Accident News: हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातून अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली. चंबा जिल्ह्यातील मसरुंड-हमल मार्गावर बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एक बोलेरो गाडी अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, गाडीतील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा प्रामुख्याने समावेश आहे. एकाच गावातील सात जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त बोलेरो गाडी ग्रामपंचायत कुठेळ अंतर्गत येणाऱ्या महल गावाची होती. या गावातील काही नागरिक शेजारच्या काकडोथा गावात आयोजित केलेल्या एका मुंडन संस्काराच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपवून रात्री उशिरा जेवण आटोपल्यानंतर सर्वजण बोलेरो गाडीत बसून आपल्या घराकडे परतत होते. मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट खोल दरीत कोसळली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासकीय पथक तातडीने मदत व बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. दुर्गम भाग आणि रात्रीचा घोर अंधार यामुळे बचाव कार्यात प्रचंड अडचणी येत होत्या, तरीही ग्रामस्थांनी धाडसाने दरीत उतरुन सर्व मृतदेह बाहेर काढले.
या भीषण अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासकीय ढिसाळपणावर तीव्र संताप व्यक्त केला. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तिथे रस्त्याच्या कडेला 'क्रॅश बॅरियर' म्हणजेच सुरक्षा कठडे लावलेले नव्हते, असा आरोप गावकऱ्यांनी केला. जर या डोंगराळ आणि धोकादायक रस्त्यावर योग्य सुरक्षा व्यवस्था असती, तर कदाचित ही मोठी दुर्घटना टाळता आली असती आणि सात निष्पाप जीवांचे प्राण वाचले असते. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या (Accident) नेमक्या कारणांचा तपास सुरु केला.
चंबा जिल्ह्यातील अपघातांची ही मालिका एवढ्यावरच थांबली नाही. या घटनेच्या अवघ्या एक दिवसापूर्वीच बनीखेत-चंबा मार्गावरील 'डॅम व्ह्यू पॉईंट'जवळ असाच एक भयंकर अपघात घडला होता. तिथे एक कार अनियंत्रित होऊन वरच्या रस्त्यावरुन थेट खालच्या चोहडा डॅम मार्गावरील दरीत कोसळली. या कारमध्ये दोन व्यक्ती प्रवास करत होते आणि त्या दोन्ही जणांचा घटनास्थळीच वेदनादायक मृत्यू झाला.
स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी (Police) कष्टाने त्यांचे मृतदेह गाडीतून बाहेर काढले. चंबासारख्या डोंगराळ जिल्ह्यात अरुंद आणि नागमोडी रस्ते, तीव्र उतार आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे अपघातांचा धोका नेहमीच वाढलेला असतो. लागोपाठ झालेल्या या दोन अपघातांनी डोंगराळ भागातील रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, प्रशासनाने आतातरी यावर कठोर पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.