
बिहार: ‘‘संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतांची चोरी सुरू आहे. बिहारमधील मतदारयादी सखोल फेरपडताळणी मोहीम (एसआयआर) हा त्याचाच अंतिम प्रकार आहे. मात्र हे षड्यंत्र बिहारमध्ये यशस्वी होऊ दिले जाणार नाही,’’ असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये ‘व्होटर अधिकार यात्रे’च्या प्रारंभाच्या निमित्ताने दिला.
सासाराम जिल्ह्यातल्या डेहरी येथील सुवरा हवाई अड्डा मैदानावर झालेल्या सभेतून राहुल गांधी यांच्या व्होटर अधिकार यात्रेला प्रारंभ झाला. या यात्रेच्या निमित्ताने विरोधकांच्या महाआघाडीने बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.
यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, राष्ट्रीय जनता दलाचे(आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे(माले) नेते दीपंकर भट्टाचार्य, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सुहासिनी अली, विकासशील इन्सान पक्षाचे मुकेश सहनी आदी ‘इंडिया’आघाडीतील घटक पक्षांचे नेते देखील उपस्थित होते.
घटना वाचविण्याची लढाई
यावेळी बोलताना राहुल गांधींनी ‘व्होटर अधिकार यात्रा’ ही राज्यघटना वाचविण्याची लढाई असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी भाषणात महाराष्ट्राच्या निवडणुकीचे आणि मतदार वाढीचे उदाहरण देऊन मतचोरीचा आरोपही केला. ‘‘महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडी जिंकली.
मात्र, त्यानंतर चार महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आघाडीला विजय मिळाला. निवडणूक आयोगाने आपल्या जादूने चार महिन्यात महाराष्ट्रात एक कोटी मतदार निर्माण केले. आमचे एकही मत कमी झाले नाही पण भाजपला सर्व नव्या मतदारांची मते मिळाली. निवडणूक आयोगाने आम्हाला मतदानाचे चित्रीकरण देण्यास नकार दिला.
कर्नाटकमध्येही एका विधानसभा मतदार संघात एक लाखापेक्षा जास्त मतांची चोरी झाली आणि भाजपने ती निवडणूक जिंकली. यावर मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर निवडणूक आयोग मला या आरोपांबाबत शपथपत्र मागत आहे,’’ असे राहुल गांधी म्हणाले. तसेच बिहारमध्ये मतचोरीचे षडयंत्र यशस्वी होऊ दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
‘...तर ती मतदारांची चूक’
‘‘बिहारमध्ये सरकार बदलले नाही तर ती मतदारांची चूक ठरेल,’’ असे भावनिक आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभेत बोलताना केले. ‘‘बिहारमध्ये गरीब, मजूर, स्थलांतरित, आदिवासी आणि अल्पसंख्याक नागरिकांची ६५ लाख मते वगळली गेली आहेत,’’ असा आरोप खर्गे यांनी यावेळी केला. ‘व्होटर अधिकार यात्रा’ ही राज्यघटना आणि लोकशाही वाचविण्यासाठी आहे त्यामुळे बिहारमधील जनतेने या यात्रेत सहभाग घ्यावा, असे आवाहन खर्गे यांनी केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, लाल किल्ल्यावरून ललकारी देत पंतप्रधान मोदी तुमचा मतदानाचा हक्क घेतला जाईल असे सांगत आहेत. खर्गे यांनी मोदींचा ‘खतरनाक व्यक्ती’ असा उल्लेख केला. ‘‘मोदींना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय जनतेचे हक्क, अधिकार आणि राज्यघटना सुरक्षित राहू शकणार नाहीत,’’ असा दावाही खर्गे यांनी केला.
मतदारयादी पडताळणीत राजकीय पक्षांचाही सहभाग, त्यामुळे खरी माहिती नेत्यांपर्यंत जात नाही किंवा मुद्दामहून भ्रम पसरविण्याचे काम सुरू
‘मतचोरी’ हा शब्द वापरणे म्हणजे राज्यघटनेचा अपमान
मतदारयादीत दोन वेळा नाव असणे म्हणजे दोन वेळा मतदान होणे नाही
आधारकार्डच्या आधारे आलेल्या आक्षेपांचा विचार करणार
महाराष्ट्रातील निवडणुकीच्या संदर्भात होत असलेल्या आरोपांवर विचारले असता ज्ञानेश कुमार म्हणाले,‘‘निवडणूक होऊन आठ महिने उलटले आहेत, पण या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे एकाही मतदाराचे नाव पुराव्यासह मिळालेले नाही. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले, त्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढली. मतदारयादीत गडबड झाली, असेल तर पुरावा म्हणून एकही मतदार समोर का आणला गेला नाही. खोटे कितीही वेळा बोलले तर ते सत्य होत नाही.’’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.