
मुंबई: सोमवारी (दि.२१) सकाळी मुंबई विमानतळावर जोरदार पाऊस कोसळत असताना एअर इंडियाच्या एका विमानाला मोठा अपघात होता होता टळला. सकाळी ९.२७ वाजता कोचीहून मुंबईत आलेल्या एअर इंडियाच्या AI-२७४४ या विमानाने (A320 aircraft, VT-TYA) धावपट्टी क्रमांक २७ वर उतरताना नियंत्रण गमावले.
धावपट्टीवर उतरल्यानंतर हे विमान जवळपास १६ ते १७ मीटर पुढे गेले आणि डांबरी नसलेल्या भागात शिरले. त्यानंतर ते टॅक्सीवेवर येऊन थांबले. या घटनेत विमानाचे इंजिनचे कव्हर खराब झाले, कदाचित ते ढिगाऱ्यांच्या किंवा मऊ जमिनीच्या संपर्कात आल्याने घडले असावे, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, सुदैवाने विमान स्वतःहून पार्किंग बेपर्यंत पोहोचू शकले.
या घटनेनंतर विमानतळाची मुख्य धावपट्टी ०९/२७ तात्काळ बंद करण्यात आली. मुंबई विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "विमानतळाच्या प्राथमिक धावपट्टीचे किरकोळ नुकसान झाले आहे. कामकाजात खंड पडू नये यासाठी, दुय्यम धावपट्टी १४/३२ कार्यान्वित करण्यात आली आहे."
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, "२०२५ च्या २१ जुलै रोजी कोचीहून मुंबईला येणाऱ्या AI-२७४४ विमानाला लँडिंगवेळी जोरदार पावसाचा सामना करावा लागला, ज्यामुळे ते धावपट्टीवरून घसरले. विमान सुरक्षितपणे गेटपर्यंत पोहोचले आणि सर्व प्रवासी व कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.
पुढील तपासणीसाठी विमान थांबवण्यात आले आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे." छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईनेही या घटनेची पुष्टी करत, तात्काळ आपत्कालीन प्रतिसाद पथके सक्रिय केल्याचे सांगितले.
यापूर्वीही मुंबई विमानतळावर पावसाळ्यात धावपट्टीवरून विमान घसरण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये, विशाखापट्टणममधून आलेले व्हीएसआर व्हेंचर्सचे एक Learjet ४५ विमान जोरदार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे धावपट्टीवरून घसरले होते. ते विमान हटवण्यासाठी अनेक तास लागले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.