Goa Agriculture : संकटात असलेले गोव्याचे कृषिवैभव

Goa Agriculture : गोमंतकीय शेतकऱ्यांची ही चार फळे त्याला सावरण्याची, पोसण्याची, श्रीमंती आणणारी, गोव्यात पूर्वजांनी भातशेती प्रमाणेच या झाडांना मोठ्या बागायती तयार करून ही भूमी सुजलाम्, सुफलाम्‌ बनवून पर्यावरण राखले होते.
goa
goa Dainik Gomantak

मधू गावकर

आपण आता चैत्रात आहोत; वसंत ऋतूची चाहूल लागली की काजू, आंबा, फणस फळांचा मौसम सुरू होतो.

गोव्यात पश्‍चिम घाटाच्या पायथ्याशी असलेली सत्तरी, धारबांदोडा, केपे, काणकोण, पेडणे आणि मध्याभागी असलेला फोंडा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात काजूपीक येते, शिवाय, बार्देश मधील पर्वरी पठार, तिसवाडीचा कदंब पठार आणि सासष्टीचा वेर्णा पठारी भागात काजूच्या बागायती पहावयास मिळतात. आंबा बागायती बार्देश, तिसवाडी, सासष्टी आणि फोंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत्या, बाकी तालुक्यात कमी प्रमाणात दिसतात, मानकुराद, मालगेस, सावेर, आफोस, कुलास, फेर्नाद, फट्या, चिमुद, बेनकुराद, अखणा, भिष्म, मांगिलाल, मुसराद, सालगाद, करेल, साकरीन, बार्देश, तिसवाडी आणि सासष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत्या, फोंडा, पेडणे, डिचोली तालुक्यात थोड्या कमी प्रमाणात होत्या, काण, केपे धारबांदोडा, सत्तरी आणि मुरगाव भागात इथल्या फुट किंवा आमली नावाने ओळखणाऱ्या आंब्याची झाडे पहावयास मिळतात.

सुपारीच्या बागा फोंडा, डिचोली, केपे, सत्तरी, पेडणे, धारबांदोडा भागात कुळागरे, मोठ्या प्रमाणात आहेत. नारळाच्या बागायती गोव्यात सर्रासपणे आढळतात. नारळाचे रोप विशेषकरून बाणावली आणि कळंगुट गावातील प्रसिद्ध म्हणून ओळखले जाते. या रोपांना मोठ्या प्रमाणात लागवडीसाठी मागणी होती.

गेल्या पन्नास-साठ वर्षांपूर्वी गोव्यात शेतकरी लोक काजूचे रोप घरी रुजवून मौसमी पाऊस सुरू होताच आपल्या अगर भाटकाराच्या जागेत लागवड करीत होते. पाच, सहा वर्षांनी काजूपीक मिळत होते. त्या पिकाच्या पैशांनी तो पावसाळ्याचा पुरवठा करीत असे. अगर एखादा समारंभ, लग्नसोहळा उरकत असे.

मानकुराद आणि इतर नावाचे कलमी आंबे शहरी बाजारात विकून पैसा मिळवायचे, गोव्यात आंब्याच्या मौसमात भाटकार लोक आपल्या भाटा कुळागारातील आंबा झाडांची पावणी करून (रेनास) फळे तोडण्यास द्यायचे, ठेकेदार आंबा विकून पैसा कमवायचे.

फणसाची झाडे गोव्यात सर्वत्र पहावयास मिळत होती. आंबा काजूचा मौसम संपत आला म्हणजे फणसाचा मौसम सुरू व्हायचा. रसाळ आणि कापे फणस बाजारात आल्यावर त्यांचा मधुरवास सुटायचा.

सुपारी हे पीक काजूप्रमाणेच गोव्यात भरपूर पिकते, काजूच्या झाडाला पाण्याची गरज नसते, सुपारीचे झाडे हिवाळा आणि उन्हाळ्यात भरपूर पाणी द्यावे लागते.

आंब्यापासून हलवा, जाम, आमरस, चॉकलेट बनवतात, आंब्याचे लोणचे बनवतात. काजूगर विकत घेताना बराच महाग घ्यावा लागतो, देशविदेशात त्याला माेठी मागणी आहे. काजू अनेक पदार्थांना वापरतात. गोमंतकीय शेतकऱ्यांची ही चार फळे त्याला सावरण्याची, पोसण्याची, श्रीमंती आणणारी, गोव्यात पूर्वजांनी भातशेती प्रमाणेच या झाडांना मोठ्या बागायती तयार करून ही भूमी सुजलाम्, सुफलाम्‌ बनवून पर्यावरण राखले होते.

गोवा स्वतंत्र झाला आणि विकासाला सुरवात झाली. शिक्षण, आरोग्य आणि विकास या ध्यासाने गोव्याने मोठी भरारी घेऊन इवल्याशा हिरव्यागार गोव्यात परप्रांतीयांचे लोढ्यांचे लोढे दाखल झाले, सात लाख लोकसंख्येचा गोवा वीस लाख पार करून गेला.

माणसाप्रमाणेच रस्ता, गाड्या स्कुटरनी भरून सर्वत्र कार्बनचे प्रदूषण होऊ लागले, अरुंद रस्ते, रुंद झाले, मायनिंग व्यवसायाने श्रीमंती आणली असा समज होऊन शेती बुजवली. बागायती नष्ट केल्या. आज प्रत्येक तालुक्यात कारखाने झाले. त्या कारखान्याबरोबर बायणा, सांकवाळ, वेर्णा, चिंबल, रुमडामळ, थिवी, फोंडा, उजगाव ठिकाणी मोठ्या वस्त्या उभ्या ठाकल्या, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक,

ओरिसा, झारखंड, यूपी, बिहार, छत्तीसगड, बंगाल राज्यातील लोक मिळेल ते काम करण्यास रेल्वे प्रवासाने गोव्यात आले. गोव्यातील पूर्वीची घरे अपुरी पडली, हे मोठ्या धनिकांनी जाणले आणि विविध राज्यांतील धनिकांनी गोव्यात अव्वाच्या सव्वा जमिनी खरेदून काँक्रीटची नगरे मिळेल तिथे उभारली. आम्ही शेतकरी बागायतदारांनी कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनी पैशाच्या लोभाने अनेक जणांना विकल्या.

आपली जमीन शेती असो, बागायती, पठारी, डोंगर भाग असला तरी आपला हिरवा असलेला गोवा आज सप्तरंगी झाला. सूर्याच्या प्रकाशाला आपण दिवस म्हणतो आणि अस्ताला गेला की रात्र म्हणतो. गेल्या पन्नास वर्षांपूर्वी काम करणारा गोवेकर संध्याकाळी घरी येऊन चिमणीच्या उजेडाने जेवणाची कामे उरकून रात्री लवकर झोपायचे. आज रात्र आणि दिवस यांच्यात फरक राहिलेला नाही, दिवस रात्र सर्वत्र प्रकाश दिसतो, बेतकीच्या गिमोणे डोंगरावर जाऊन रात्री चौफेर नजर फिरवितो.

goa
Goa Accident: राज्यात अपघातांचे सत्र सुरुच; बांबोळीत भरधाव कारला दुचाकीची जोरदार धडक

आज गोव्यात गोंयकार हरवत चालला आहे, गोव्यात शिक्षणाने क्रांती झाल्याने गावातील मुले सहज दहावी बारावी पास होऊन शिक्षणाची मिजास मिरवतात. पण बाहेरील युवक मजुरीसाठी येतो आणि मिळेल ते काम करतो. त्याला विचारल्यास तो पदवीधर असतो. याच गोव्यात नोकरीला लागून आपला विकास साधतो.

आज गोमंतकीय तरुण मंडळी आपल्या शेतात उतरत नाही, घरातील कामावर लक्ष नाही, महिना दहा, पंधरा हजार पगाराला कारखान्यांत जातो, घरातील वडील मंडळी शेतात जाते. आणि मुले रिकामटेकडी फिरताना दिसतात. हातात मोबाईल, सिगारेट, तंबाखू, दारू आणि ड्रग्समध्ये गुंतत जात आहे. अशा उदासतेने हिरव्या गोव्यात प्रदूषण वाढून आपल्या जमिनीच्या नासाडीने पीक घटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com