Religion
ReligionDainik Gomantak

धर्म आणि अर्थविचार

अर्थ याचा अर्थ केवळ पैसा नव्हे. जगण्यासाठी जे जे काही लागते ते सर्व ‘अर्थ’ या संज्ञेत येते.

प्रसन्न शिवराम बर्वे

धर्म म्हणजे काय, धार्मिक असणे म्हणजे काय, याचा विचार आपण गेल्या दोन लेखांमध्ये थोडक्यात केला. या लेखात आपण अर्थ या मूल्याचा विचार करू. अर्थ म्हणजे पैसा नव्हे. ते जीवनपद्धतीतील एक मूल्य आहे. ढोबळमानाने जगण्यासाठी लागणारी सर्व ऐहिक साधने म्हणजे अर्थ.

पुरुषार्थ चतुष्टयाची सुरुवात करतानाच एक गोष्ट नमूद केली होती की, केवळ अर्थ किंवा केवळ काम असा सुटा सुटा विचार आपल्यकडे नाही. धर्माने अर्थ आणि धर्माने काम. धर्मामध्ये जी दहा लक्षणे सांगितली आहेत, त्याला अनुसरून अर्थ आणि काम ही दोन्ही मूल्ये आहेत.

अर्थ व काम ही मूल्ये धर्म या मूल्यावर आधारित आहेत. ‘धर्मेण अर्थ:’ व ‘धर्मेन काम:’ हे अर्थ व काम या मूल्यांचा विचार करताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ‘धर्माने अर्थ’ ही गोष्ट कायम लक्षांत ठेवावी.

आमचा कायम असा दावा असतो की, या गोष्टी कुणी आम्हाला शिकवल्याच नाहीत. आमच्यापासून लपवल्या गेल्या. धर्म ही आणि त्यातल्या त्यात पुरुषार्थ चतुष्टयातील धर्म, अर्ध आणि काम ही त्रयी प्रत्यक्ष आचरणाचा भाग आहेत.

सामान्य घरातील वृद्ध महिला किंवा भाजी विकणारी एखादी महिला बोलताना, वागताना मुद्दाम निरीक्षण करावे. घरात एखादी वृद्ध स्त्री म्हणते, ‘संपले, फुटले असे म्हणू नको. जास्त झाले, वाढवले, असे म्हण’ तेव्हा ती नेमके काय सांगत असते, याचा विचारही आपण करत नाही.

कडतरीहून वाळपईला कदंबातून येत होतो. एक वृद्ध महिला एके ठिकाणी उतरली. बस पुन्हा सुरू झाली. ती महिला बसमागे धावत थांबा थांबा असे ओरडत येत होती. कंडक्टरने बस थांबवली. त्या महिलेने चार रुपये कंडक्टरला दिले.

तो वैतागून म्हणाला, ‘आगे चार रुप्याखातीर बस थारयलय?’ धाप लागलेल्या, सुरकुत्यांनी भरलेल्या चेहर्‍यावर स्मितहास्य पसरले; म्हणाली, ‘बाबा, देवाक तोण दाखोंवक जाय’. कंडक्टरने दार लावून घेतले व बस पुढे निघाली. आपण प्रवास केला, त्याचे पैसे द्यायला हवे, हे धर्मानुसार अर्थकारणाचे मूल्य त्या अशिक्षित महिलेला कुणी शिकवले होते?

सुशिक्षित असलेल्या कंडक्टरने पैसे घेऊन त्या महिलेला तिकीट दिले नाही. हे अधर्माने केलेले अर्थकारण होय. आपण सुशिक्षित होतो, सुसंस्कृत व्हायचे राहून जाते. आपण पांथिक होतो, धार्मिक व्हायचे राहून जाते.

Religion
I compete naturally: नैसर्गिक शरीरस्वास्थ्याचा यथोचित पुरस्कार

अर्थ याचा अर्थ केवळ पैसा नव्हे. जगण्यासाठी जे जे काही लागते ते सर्व ‘अर्थ’ या संज्ञेत येते. मत्ता, सत्ता, संपत्ती, सर्व भौतिक साधने, त्यासाठी करावे लागणारे व्यवहार हे सगळे ‘अर्थ’ या एका शब्दात येते. ज्यामुळे जीवनाला अर्थ लाभतो ते कारण म्हणजे अर्थ. हे सगळे धर्माने नियंत्रित होणे गरजेचे आहे. धर्म हा विचार त्यामागे असला पाहिजे.

अन्यथा एका चक्रात आपण अडकत जातो. चांगली नोकरी हवी म्हणून शिकायचे की, आपल्याला उपजत असलेल्या ज्ञानात आणखी वाढ व्हावी म्हणून शिकायचे? आपल्या जीवनाची सगळी गणिते अर्थकारणावर आधारित होत चालली आहेत.

आपण फक्त धावत आहोत, कधीतरी थांबून ‘कशासाठी?’ हा प्रश्‍न आपण आपल्यालाच विचारायला हवा. मागे वळून पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येईल की, ज्यासाठी आपण हे सगळे करतो, ते आपल्यापासून खूप दूर गेले आहे.

Religion
Panjim Smart city: तरुण पणजी

एक गोष्ट ठामपणे स्वीकारावी की, ‘पैशात सुख नसते’. पैसा सुखासाठी कमवायचाच नसतो. पैसा सुविधेसाठी कमवायचा असतो. पैसा फक्त सुविधा देतो, सुख नाही. यातील किती सुविधा आपल्याला खरोखरच आवश्यक आहेत, याचा कधी विचार केला तर लक्षात येईल की, ज्याची गरजच नव्हती अशा अनेक गोष्टींच्यामागे आपण विनाकारण धावलो.

अनावश्यक गरजांना ‘बेसिक गरजा’ बनवले आहे. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी कमावताना, मुलांना आता वर्तमानात वेळ देणेही तितकेच आवश्यक आहे, हे विसरून चालणार नाही. अविचारी, अनियंत्रित व्यवहार, अर्थकारण हा अधर्म आहे.

याचा अर्थ पैसा कमवूच नये, श्रीमंत व्हायची इच्छाच धरू नये असा नाही. ‘चांगली गरिबी, वाईट श्रीमंती’, ‘पैशाच्या मागे लागू नका’, ‘लक्ष्मी विरुद्ध सरस्वती’ वगैरे चुकीचे विचार आपण पसरवले आहेत. जे आवश्यक आहे ते आणि तेवढेच कमावणे कधीही चुकीचे नाही.

पण, ते करत असताना करावी लागणारी तडजोड कितपत योग्य आहे, याचा विचार कायमच करावा. पैसा आहे, पण विचारपूस करणारी माणसेच नाहीत, असे होऊ नये. करोनाने आपल्या पिढीला खूप काही शिकवले आहे.

Religion
रायगडावरील सिंहासनाची व्यवस्था

‘लांड्यालबाड्या करून, लोकांना फसवून रग्गड पैसा कमावणार्‍यांचे कुठे काय वाईट होते?’, हा घातक विचार आहे. हा विचार आपल्या चुकीच्या वागण्याचे समर्थन करण्यासाठी पुढे केला जातो.

दहा दहा रुपयांची लाच गरिबातल्या गरिबाकडून पिळून घेणारी व्यक्ती, अशा जागी तडफडत मरण पावली, जिथे पाणी द्यायलाही कुणी नव्हते.

गरज आहे तितके कमवावे, गरज आहे तितकेच निसर्गातून घ्यावे. ओरबाडू नये. निसर्गाला ओरबाडल्याचे कर्मफळ आपल्याला दुष्काळ, पूर या रूपाने परत मिळते.

जे आपण निसर्गाच्याबाबतीत करतो, तेच सार्वजनिक संपत्तीबाबत करतो. ‘कोणाक पडलां?’, ‘कोण विचारतलो?’, असे प्रश्‍न आपण विचारतो. सार्वजनिक साधन संपत्तीचा विचार करतानाही धर्म हाच आधार असला पाहिजे.

कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रामध्ये राज्यशास्त्राचा विचार करताना अर्थ यातून व्यक्ती म्हणून लागू होणारा धर्म वगळला आहे. पण, राजधर्म सोडावा असे सांगितले नाही.

आपण, पर्यटनासाठी जेव्हा बाई, बाटली, जुगार अशी गोव्याची प्रतिमा उभी करतो, डोंगर कापून सपाट करतो ते चुकीचे आहे. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता या चक्रात अडकलेले राजकारण व अर्थकारण आपला राजधर्म विसरले आहे. धर्माला वगळून अर्थ हा अनर्थच असतो, अधर्मही असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com