Sambhaji Maharaj
Sambhaji MaharajDainik Gomantak

Sambhaji Maharaj: समरांगणावर शत्रुला धडकी भरवणारे छत्रपती संभाजी महाराज

कंक पिता-पुत्रांनी केलेल्या अतुलनीय पराक्रम व छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांवर बसवलेला दरारा यांच्या स्मृती मूर्तीरूपाने जागृत ठेवणे आवश्यक आहे.

Sambhaji Maharaj

सर्वेश बोरकर

छत्रपती संभाजी महाराज आणि कृष्णाजी व येसाजी कंक यांनी गोव्यासाठी केलेल्या कार्याची आठवण म्हणून त्यांचे पुतळे उभारणे आवश्यक आहे.

मराठे मुघलांच्या धोक्यापुढे झुकतील, असे गृहीत धरून पोर्तुगिजांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. 17 ऑक्टोबर 1683 रोजी व्हाइसरॉयने सीमेवरील अगास(आगशी) गावात तळ ठोकला. 7 नोव्हेंबर रोजी त्यांनी नदी ओलांडून ते फोंड्याच्या पश्चिमेकडील गावात पोहोचले व्हाइसरॉय फ्रान्सिस्को डी ताव्होरा याने 3,700 सैनिक आणि लांब पल्ल्याच्या तोफांसह फोंडा किल्ल्याच्या दिशेने कूच केले.

फ्रांसिस्को डी ताव्होरा एक अनुभवी आणि शूर सेनापती होता. त्याने स्पेनमधील विविध लष्करी मोहिमांचे यशस्वी नेतृत्व केले होते आणि गोव्याचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी अंकोला येथे गव्हर्नर म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती.

फोंडा किल्ल्याच्या (संरक्षक कड्यावर) अचूक हल्ला करण्यासाठी त्याने आपल्या माणसांना तोफा शेजारच्या टेकडीवर ठेवण्याचे आदेश दिले आणि नंतर गोळीबार सुरू केला. तोफांच्या सततच्या हल्ल्यामुळे फोंडा किल्ल्याची बाहेरील भिंत कोसळली. ओसंडून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याप्रमाणे, पोर्तुगीज सैन्य किल्ल्यात घुसले.

Sambhaji Maharaj
Sambhaji Maharaj: अखंड शौर्याचे प्रतिक ! छत्रपती संभाजी महाराज

मात्र, येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक त्यांच्यासमोर मजबूत ढालीप्रमाणे उभे होते. आपल्या नेत्याने शत्रूला दिलेला धाडसी लढा पाहून 600 मावळे घोड्यावर स्वार झाले आणि सिंहासारखे लढले. मराठ्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे पोर्तुगिजांना किल्ल्यावरून माघार घेण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.

मराठ्यांनी सलग 8 दिवस आणि रात्री पोर्तुगिजांच्या आक्रमणाचा प्राणपणाने प्रतिकार केला. यातील एका चकमकीत शूरवीर कृष्णाजी कंक हे गंभीर जखमी झाले, काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला

छत्रपती संभाजी महाराज राजापूरला असताना त्यांना फोंड्यावर पोर्तुगिजांचा हल्ला झाल्याचे समजले. शूर शंभूराजांनी अहंकारी पोर्तुगिजांना आयुष्यभराचा धडा शिकवण्याचे ठरविले. आपल्या 2,000 पायदळ आणि 800 घोडेस्वारांसह फोंड्याच्या बचावासाठी ते निघाले.

येसाजी कंक यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिलेल्या 8 दिवसांच्या लढाईमुळे छत्रपती संभाजी महाराज यांना वेळेत फोंडा गाठणे शक्य झाले.

छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीज सैन्यावर केलेल्या आक्रमणाचे वर्णन खुद्द व्हाइसरॉयनेच नोंदवले आहे. ते म्हणाले, ‘आपण वादळ किंवा चक्रीवादळाचा सामना करू शकतो, पण छत्रपती संभाजीचा हल्ला सहन करू शकत नाही. ज्याप्रमाणे हत्ती बागेत शिरून गवत उखडून टाकतो, त्याचप्रमाणे संभाजीराजांनी आपले सैन्य उडवून दिले’.

समरांगणावर छत्रपती संभाजी महाराज स्वबळाने झुंज देत होते. आपल्या वर्चस्वाला आव्हान देण्याचे धाडस करणाऱ्या व्हाइसरॉयचा शोध घेत त्यांचे डोळे रागाने भरून आले होते. शत्रूच्या रोखाने, ‘हर हर महादेव!!’ असा जयघोष करत जात त्यांनी आपली तलवार उचलून पोर्तुगीज सेनापतीच्या दिशेने फिरवली.

छत्रपती संभाजी महाराजांची तलवार इंचभर चुकल्यामुळे फ्रान्सिस्को डी ताव्होरा यांच्या घोड्याच्या मानेवर आदळली. राजांनी पोर्तुगीज व्हाइसरॉयची परिस्थिती इतकी भीषण बनवली की त्याला किल्ल्यावरून पळावे लागले.

Sambhaji Maharaj
Saptakoteshwar Temple: गोव्याचे राज्य-दैवत सप्तकोटेश्वर

पुढे 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांना पूर्णपणे हाकलून देण्याची योजना आखली. त्यामुळे त्यांनी संगमेश्वर येथे बैठक आयोजित केली. त्यावेळी संभाजी राजे त्यांचे मित्र आणि सल्लागार कवी कलश आणि काही विश्वासू लोक त्यांच्यासोबत होते. कारण ती बैठक अत्यंत गोपनीय होती.

मुकर्रबखान या मुघल सेनापतीला संभाजी राजे संगमेश्वरला आल्याची बातमी कळली. फेब्रुवारीमध्ये संगमेश्वर येथे झालेल्या चकमकीत संभाजी राजे आणि त्यांच्या सल्लागारांना ममुकर्रखानच्या मुघल सैन्याने पकडले.

पकडलेले छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना सध्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील, तालुका- श्रीगोंदा, मौजे पेडगाव या गावातील बहादुरगडावर (नवीन नाव धर्मवीरगड) नेण्यात आले. जेथे औरंगजेबाने त्यांना विदूषकाचे कपडे घालून अपमानित केले.

मराठा दस्तऐवज असे सांगतात की त्यांना बादशाह औरंगजेबासमोर नतमस्तक होण्याचा आणि इस्लाम स्वीकारण्याचा आदेश देण्यात आला होता. आणि त्याने तसे करण्यास नकार दिला.

Sambhaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्याशी असलेले ऋणानुबंध

औरंगजेबाने छत्रपती संभाजी आणि कवी कलश यांना मृत्युदंड देण्याचे आदेश दिले. या प्रक्रियेला पंधरा दिवस लागले. त्यांचे डोळे काढले, जीभ छाटली, त्यांची नखे उपटून काढली, त्यांची त्वचा सोलून काढली.

शेवटी 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे शरीर वाघनखांनी (धातूचे वाघाचे पंजे) पुढच्या आणि मागच्या बाजूने फाडून टाकले. शेवटी पुण्याजवळ भीमा नदीच्या काठावर तुळापूर येथे कुर्‍हाडीने शंभूराजांचा शिरच्छेद केला.

छत्रपती संभाजी महाराज आणि कृष्णाजी व येसाजी कंक यांनी गोव्यासाठी केलेल्या कार्याची आठवण म्हणून त्यांचे पुतळे उभारणे आवश्यक आहे. कंक पिता-पुत्रांना केलेल्या अतुलनीय पराक्रम व छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांवर बसवलेला दरारा यांच्या स्मृती मूर्तीरूपाने जागृत ठेवणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com