Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्याशी असलेले ऋणानुबंध

छत्रपती शिवाजी महाराज यांचे गोव्याशी अनेक अर्थाचे ऋणानुबंध होते. छत्रपतींनी त्यांच्या हयातीत तीन वेळा प्रत्यक्ष गोमंतभूमीवर पाय ठेवला .
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajDainik Gomantak

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज यांचे गोव्याशी अनेक अर्थाचे ऋणानुबंध होते. छत्रपतींनी त्यांच्या हयातीत तीन वेळा प्रत्यक्ष गोमंतभूमीवर पाय ठेवला आणि सहा वेळेला विविध अर्थाने गोमंतकीय जनतेची जुलमी पोर्तुगीजांच्या राजवटीतून सुटका करण्यासाठी प्रयत्न केले. पुढे युवराज संभाजी महाराजांनी ही परंपरा कायम ठेवली.

इथेच हिंदवी स्वराज्याचे ऋणानुबंध संपत नाहीत. अगदी करवीर आणि सातारा या दोन्हीही गाद्यांचे वंशजांचे 1818 पर्यंत सरळ संबंध राहिले त्यानंतरही गोव्यातील बहुतांश भाग हा सावंतवाडीकर भोसले आणि सौंदेकर या मराठा सरदारांच्या साम्राज्यांचा भागच राहिला होता. हिंदुस्थानात इंग्रजांचा अंमल सुरू झाल्यानंतर पोर्तुगीजांनी सध्याचा गोवा आपल्या ताब्यात घेतला.

मात्र पोर्तुगीज आणि आदिलशहाच्या जुलमी राजवटीला मर्यादित सीमेत ठेवण्याचे आणि इथले जनतेचे रक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य छत्रपतींच्या मराठा साम्राज्य व स्वराज्याने केले आहे.

पोर्तुगीज व मुगल यांच्या निरंकुश सत्तेवर अंकुश लावण्याबरोबर इथली संस्कृती, इथल्या देवदेवतांचे रक्षण करण्याचे काम छत्रपतींच्या स्वराज्याने केले म्हणून गोमंतकीयांचे त्यांच्यावरील प्रेम आजही आबादित आहे. त्यामागील इतिहास ही तितकाच रंजक आणि जाज्वल आहे.

महाराजांनी 1661 मध्ये डिचोली आणि सांखळी हे 2 आदिलशाहीचे प्रांत जिंकल्यामुळे या 2 प्रांतांत समाविष्ट झालेले पेडणे, मणेरी आणि सत्तरी या 3 महालांवरही महाराजांची सत्ता प्रस्थापित झाली. अशा तऱ्हेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी राज्याची सीमा पोर्तुगीजांच्या बार्देश प्रांतास भिडली.

पुढे महाराजांनी फोंडा किल्ल्याला वेढा दिला पण आदिलशाहीस पोर्तुगीजांनी साहाय्य केल्याने लढा उठवावा लागून डिचोली, सांखळी सोडावी लागली. वर्ष 1666च्या मार्च मासात छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही राज्यात समाविष्ट झालेल्या फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला. किल्ल्यात सैन्य-शिबंदी बेताचीच होती.

किल्ला महाराजांच्या कह्यात आला असता; पण पोर्तुगीजांनी नदीतून दुर्भाटवरून किल्ल्यात गुप्तपणे दारूगोळा आणि अन्नसामुग्रीची रसद पुरवली. त्यामुळे किल्लेदारास किल्ला लढवणे शक्य झाले.

पुढे काही दिवसांनी विजापूरहून सरदार रुस्तुमजम्मा मोठे सैन्य घेऊन किल्लेदाराच्या साहाय्यास आला. त्यामुळे महाराजांना वेढा उठवणे भाग पडले, तसेच सांखळी आणि डिचोली हे दोन्ही प्रांत आदिलशाहीस सोडावे लागले.

Chhatrapati Shivaji Maharaj
Goa: गोवा सरकार शॅकमालकांच्या मुजोरीपुढे झुकणार ?

महाराजांनी नार्वेच्या श्री सप्तकोटीश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार केला

महाराजांनी तह करूनही पोर्तुगीज देसाई मंडळींना महाराजांच्या विरुद्ध चिथावणी देऊ लागले. त्यानंतर पुन्हा युद्धाचा प्रसंग येताच पोर्तुगिजांनी वर्ष 1668 मध्ये देसाईंना आपल्या राज्याबाहेर घालवून दिले.

ते मग महाराजांना शरण गेले. या काळात महाराजांचा मुक्काम डिचोलीत होता. त्यांचा मुक्काम डिचोली येथे असतांना नार्वे येथील श्री सप्तकोटीश्‍वर देवालयाचा जीर्णोद्धार त्यांनी केला. ​नार्वेच्या श्री सप्तकोटीश्‍वर देवालयाला तसा प्रदीर्घ इतिहास आहे. श्री सप्तकोटीश्‍वराचे मंदिर पूर्वी दीपावती अथवा दिवाडी बेटावर होते.

कदंब राजघराण्याचे हे आराध्यदैवत होते. चौदाव्या शतकात मुसलमानांनी त्या मंदिराचा विध्वंस केला होता. पंधराव्या शतकात कोकण प्रांत विजयनगरच्या हिंदु राजसत्तेखाली समाविष्ट होताच, विजयनगरचा सेनापती माधव मंत्री यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हल्लीच गोवा सरकारने या मंदिराचा जीर्णोद्धार करून लोकार्पण केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com