Blog: विकासाची प्रगती कायदा अन् सामाजिक नीतिनुसार!

Blog: खाणींच्या बाबतीत ती कायद्याने व सामाजिक नीतिनुसार ही खाणवाल्यांचीच जबाबदारी आहे.
Blog | Mine
Blog | MineDainik Gomantak

Blog: खाणकाम पूर्ण होऊन तेथील खनिज नेल्यावर टाकावू माती पुन्हा खाणीत भरून तेथे जंगल-झाडे वाढविणे आणि परिसर पूर्वस्थितीत आणणे, हा सर्व खर्च वजावटीतच टाकावा लागेल. कारण खाणींच्या बाबतीत ती कायद्याने व सामाजिक नीतिनुसार ही खाणवाल्यांचीच जबाबदारी आहे.

कोरियातील चियांग्ये चांग या ओढ्याचे 5 किमीचे प्रछन्न कॉंक्रिटीकरण आणि ते सर्वच्या सर्व पावशतकाच्या आत मोडून टाकावे लागणे, हे आजच्या विकासप्रणालीचे एक बटबटीत उदाहरण आपण गेल्या लेखात पाहिले. यासारखी विकासाची अनेक परिमाणे उरावर घेऊन आजची पिढी जगत आहे. काहींची दुरुस्ती सुरू झाली आहे. ती बराच काळ चालणार आहे. अल्प यशावर समाधान मानावे लागणार आहे.

Blog | Mine
Konkani Language : कोंकणीत रुजलेले पोर्तुगीज शब्द

सृष्टीची स्थिती अशी आहे की, जणू काही महायुद्ध झालेले आहे आणि गावे, शहरे उदध्वस्त झाली आहेत. शिल्लक काय राहिले आहे, ते गोळा करून त्याची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. जैवविविधतेच्या बाबतीत हेच आहे. नामशेष झालेल्या जीव-जाती पुन्हा कधीही निर्माण होणार नाहीत. ते कधीही भरून न येणारे नुकसान आहे. ज्या अजून कशाबशा तग धरून आहेत, त्या सुरक्षित राहाण्यासाठी प्रचंड यातायात करावी लागत आहे. महाराष्ट्रात माळढोक पक्षी, गिधाडे, मध्य प्रदेशात चारशिंगा, अशी अनेक उदाहरणे आहेत.

भारतातून चित्ता हा सर्वांत वेगवान प्राणी पाऊण शतकापूर्वी नाहीसा झाला. तो जगात कुठेतरी होता म्हणून आज त्याला पुन्हा येथे सुस्थापित करण्याचा प्रयत्न करता आला. पण त्यासाठी केवढा आटापिटा कारावा लागत आहे! जगातून नाहीशा झालेल्या चर जीवजाती व अचर वनस्पती यांना सृष्टीच्या ताळेबंदात बुडित खात्यावरच टाकावे लागणार आहे. अन्नशेतीतील प्रत्येक अन्नप्रकाराची शेकडो, हजारो वाणे एकट्या भारतात शेतीच्या लोकपरंपरेतून जतन करून ठेवली होती.

आजच्या आधुनिक शेतीच्या संकरित बियाण्यांच्या आक्रमक कार्यपद्धतीमुळे निम्मी शेती समूळ नष्ट झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता जैवविविधता जतन कार्यक्रमाद्वारे त्यांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पूर्वी लोकपरंपरेतून ती सहज जतन होत असत. आता एकेका वाणासाठी भरपूर प्रयत्न करावे लागत आहेत. जी वाणे कायमची नाहीशी झाली, त्यांचे मोल फार मोठे आहे आणि त्याची वजावट विकासाच्या खात्यावरच टाकावी लागणार ना?

विकासकामांसाठी जमिनीवरील वृक्षांचे आच्छादन हटविल्याने आणि जमिनीचा पृष्ठभाग हटविल्याने दर पावसाळ्यात भूपृष्ठावरील अब्जावधी टन सुपीक माती पावसामुळे नद्यांत, समुद्रात वाहून जात आहे. एक इंच जाडीचा सुपीक मातीचा थर तयार करण्यास सृष्टीला आठशे ते हजार वर्षे लागतात. विकासकामांच्या निमित्ताने भूमीवरील त्यांचे संरक्षण हटविल्याने पावसाळ्यात पाचशे-हजार वर्षांच्या सृष्टीची कमाई वाहून जाते. विकासाच्या निष्काळजीपणाची, बेबंदशाहीची केवढी मोठी किंमत मोजावी लागते?

रासायनिक खते, कीटकनाशके, तृणनाशके यांच्या अनिर्बंध वापरामुळे जमिनीतील पोषकद्रव्ये वनस्पतींना पुरवणारी जीवजंतूंची साखळीच उदध्वस्त झाली आहे. अन्न विषमय झाले आहे. त्याकरिता आज आपण जैविक शेतीकडे वळत आहोत. त्यातून पुन्हा माती पूर्वस्थितीत येऊ शकेल. त्यासाठी काही वर्षे जावी लागतील. आधुनिक शेतीच्या नावाखाली झालेल्या नुकसानीची भरपाई नुकसान करणारे भरणार नाहीत. पुढच्या पिढीला ती भरावी लागणार आहे. पृथ्वीच्या ताळेबंदात हे नुकसान शेतीचा विकास याच खात्यावर जाणार ना?

औद्योगिक विकासातून कारखानदारी, वाहतूक, ऊर्जेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. शहरीकरण वाढले, याचा परिणाम म्हणजे सर्वत्र व इतर वायूंची नैसर्गिक लयीत फिरणारी चक्रे यांची लय बिघडली. कार्बन जमिनीत वनस्पतींसाठी पाहिजे होता. तेथून कमी झाला व हवेत वाढला. वातावरणाच्या वरच्या स्तरात जाऊन बसला आणि वैश्‍विक तापमान वाढवू लागला. त्याबरोबर वादळ-वारा, पाऊस-पाणी याचे प्रारूपच बेभरंवशाचे झाले.

Blog | Mine
Goa Politics: विरोधकांची पिछाडीवरुन पीछेहाट

समुद्रातील वादळांची वारंवारिता वाढली, ढगफुटी, पूर, प्रलय, गावे, शहरे बुडण्याचे प्रकार लावले. इमारतींची पडझड, साधनसुविधांचे नुकसान होत आहे. ते पूर्वीही कधीतरी व्हायचे. आज ते दुप्पटीहून जास्त होत आहे. त्याचा मोठा वाटा आजच्या विकासाच्या प्रकारामुळे असल्याने ते त्याच्या खात्यावरच टाकावा लागेल. प्रदूषण सार्वत्रिक झाले. भूमी प्रदूषित झाली. भूजल प्रदूषित झाले. नद्या-नाले, तलाव-सरोवरे, समुद्र प्रदूषित झाला. समुद्रात किनाऱ्यापासून आत दहा-वीस किलोमीटरपर्यंत प्लास्टिक कचऱ्याचा थर दाटला. त्यात समुद्रतळाच्या जलजीवांचा अधिवास नष्ट झाला. शहरे वाढली, त्यात तळी बुजवली गेली.

नद्यांची रुंदी कमी करण्यात आली. वाहत्या जलस्रोतांची गटारे झाली. त्यात गंगा-यमुनासारख्या पवित्र नद्यांचीही गटारे बनली. कोल्हापूरच्या पंचगंगेचे मी 1962 साली दर्शन घेतले. 1986 पर्यंत कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी मी ओंजळी भरून प्यायलो आहे. आज त्यात पाय बुडवितानाही शिसारी यावी, अशी स्थिती विकासाने निर्माण केली आहे. आज गंगेचा काही भाग सुधारण्याची पराकाष्ठा झाली. हजारो कोटी रुपये ओतले. पण यश मर्यादितच आहे.

देशातील सर्व जलस्रोत शतकापूर्वीच्या स्थितीत आणायचे झाल्यास काही कोटी अब्ज रुपये खर्च करणे शक्य नाही. ही वजावट विकासाच्या खात्यावर नको का पडायला? समुद्राचे प्रदूषण काढून टाकणे, हे तर मानवी प्रयत्नांच्या बाहेर गेले आहे. भूजलाचे प्रदूषणही काढून अशक्य झाले आहे. जमिनीतून खनिजांची अनिर्बंध लूट झाली आहे. खनिज हे सृष्टीचे भांडवल. ते काढून नेणे म्हणजे सृष्टीच्या भांडवलाची वजावट.

Blog | Mine
Goa Politics: विरोधकांची पिछाडीवरुन पीछेहाट

त्याशिवाय त्या जागेवरील अरण्य, झुडपे, गवत वगैरे जैवभार, त्याने धरून ठेवलेली पृष्ठभागावरील सुपीक माती, पावसाचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता हे सर्व काढून टाकल्याबद्दल त्याचे मोल, खाण जमिनीचे, तसेच रस्ते आणि साधनसुविधेसाठी वापरात आलेल्या जमिनीचाही त्यात अंतर्भाव व्हायला पाहिजे. खाणीतून खनिजाच्या काही पटीत टाकाऊ माती निघते. ती टाकण्यासाठी लागलेली जमीन, ती वाहून जाऊ नये म्हणून केलेली व्यवस्था या सर्वांचा अंतर्भाव आवश्यक आहे.

त्याशिवाय खाणकाम पूर्ण होऊन तेथील खनिज नेल्यावर टाकावू माती पुन्हा खाणीत भरून तेथे जंगल-झाडे वाढविणे आणि परिसर पूर्वस्थितीत आणणे, हा सर्व खर्च वजावटीतच टाकावा लागेल. कारण खाणींच्या बाबतीत ती कायद्याने व सामाजिक नीतिनुसार ही खाणवाल्यांचीच जबाबदारी आहे. सरकारी शासनव्यवस्थेला त्यांनी गुंडाळून ठेवले असले तरी सृष्टीचे हे नुकसान झालेलेच असते. हे सर्व प्रत्यक्ष होणाऱ्या पर्यावरण नाशाचे ठळक मुद्दे आहेत.

पावसाबरोबर खाणींमधील नद्यांमध्ये वाहून गेलेला गाळ, जलजीवांचे झालेले नुकसान, खाणव्याप्त भागांतील वन्यजीवांचे झालेले अधिवास, नष्ट झालेली वन्य जीवनसाधने, त्यामुळे त्यांचे (विस्थापित प्राण्यांचे) होत असलेले शेती-बागायतीवरील आक्रमण, त्यातून शेती-बागायतींचे नुकसान, कार्बन व उष्मा शोषणारी या भागातील सृष्टीची व्यवस्था काढून घेतल्याने होणारे वैश्विक नुकसान, या सर्व प्रकारांच्या नुकसानीची कोणतीही भरपाई सांप्रतच्या खाणविकास व्यवस्थापकांनी केलेली नाही. फक्त खनिज लुटून नेले आहे.

Blog | Mine
Goa Congress: भाजपाला भरीव यश; काँग्रेससाठी धडा!

खाणीत व रस्त्यांवर धावणारे हजारो ट्रक यांमुळे खाणभागातील लोकांमध्ये क्षयरोग व इतर फुफ्फुसाच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्यांना कोणी नुकसान भरपाई दिली? ''विकासाचे आजचे जे प्रारूप तयार झाले आहे, त्यातून घडली गेलेली एक जीवनव्यवस्था व जीवनशैली, त्यातून किती प्रकारचे रोग निर्माण झाले, विस्तारले! माणसाच्या किती प्रकारच्या क्षमता रोडावल्या, नष्ट झाल्या! माणसांच्या अपेक्षा वाढल्या, त्यांची पूर्तता न झाल्याने नैराश्‍य वाढले. तांत्रिक उपकरणांद्वारे दूरदूरचे संबंध वाढले आणि जवळचे संबंध दुर्बळ झाले. एकाकीपणा आला. आजारांवरील उपचारपद्धती व सोयी वाढल्या; पण आजारही वाढले.

माणसाचा वेळ न कष्ट वाचवण्याची, आराम देण्याची साधने आली. पण वेळ मात्र संपला. नवनव्या प्रकारच्या सुरक्षा-साधनांची रेलचेल झाली. पण चोऱ्या-दरोडे, बलात्कार, खून, अपघात यांचीही टक्केवारी वाढली. भौतिक सुखसोयी ढिगांनी आल्या; पण समाधान, शांती, जीवनानंद नाहीसा झाला. घाई-गडबड, ताणतणाव यांनी जीवन ग्रस्त झाले. समंजस, सोज्वळ, कुटुंबवत्सल मध्यमवर्गातही लग्नाची संस्कारित नाती तुटण्याची गती कमालीची वाढली. विज्ञान-तंत्रज्ञानाने अख्खे जग जवळ आले; पण घराघरांतील जिव्हाळा संपून माणसांमध्ये दऱ्या निर्माण झाल्या.

भौतिक समृद्धता आली ती भावनिक व नैतिक दारिद्र्य घेऊनच. किती किती हिशेब करणार आणि किती गणिते मांडणार? विकास आणि प्रगतीमागे अख्खे जग वेगाने धावत आहे, विनाशाच्या तुटलेल्या कड्याकडे! आता शेवटचा टप्पा आहे वाटेला वळण देण्याचा. अमेरिकेचे माजी अध्यक्ष ओबामा म्हणतात, ‘आजची मानवजातीची ही पहिलीच पिढी असेल, जी अशा दुर्धर संकटांना तोंड देत आहे आणि तीच शेवटची पिढी राहील, काही उपाय योजण्याची संधी असलेली.’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com