Family System: कुटुंब व्यवस्थेचे, मूल्यांचे रक्षण व्हावे

कुटुंबव्यवस्था हा गृहस्थाश्रमाचा गाभा आहे. ज्याप्रमाणे लग्न किंवा विवाहसंस्थेला धक्का लावण्याचे प्रयत्न निरंतर सुरू आहेत, तसेच कुटुंबव्यवस्थेला नष्ट करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
कुटुंब व्यवस्था
कुटुंब व्यवस्थाDainik Gomantak

प्रसन्न शिवराम बर्वे

कुटुंबव्यवस्था हा गृहस्थाश्रमाचा गाभा आहे. ज्याप्रमाणे लग्न किंवा विवाहसंस्थेला धक्का लावण्याचे प्रयत्न निरंतर सुरू आहेत, तसेच कुटुंबव्यवस्थेला नष्ट करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. मूल्य म्हणूनही असलेल्या स्थानाचे अवमूल्यन कसे करता येईल याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.

कुटुंब व्यवस्था
Anandacha Chowk : ...म्हणून, पोर्तुगीज वसाहतीच्या काळात या भागाला 'आनंदाचा चौक' असे नाव देण्यात आले

कुटुंब या शब्दाची व्याप्ती पूर्वी खूप मोठी होती. आता ती पती, पत्नी व मूल इतकीच मर्यादित झाली आहे. ‘आमचो भावोजी’, ‘आमचो जांवय’, ‘आमची सून’ हे शब्द आता सहसा कानी पडत नाहीत. वास्तविक ज्या घरात प्रत्यक्ष नाते असे, त्यापेक्षाही हे नाते फार प्रबळ होते.

‘आमचो भावोजी’, म्हणणाऱ्या व्यक्तीच्या सख्ख्या बहिणीचे त्याच्याशी लग्न झालेले नसायचे, त्याच्या गावातील किंवा वाड्यावरील किंवा शेजारच्या घरातील मुलीचा तो नवरा असायचा. पण, संबोधन मात्र ‘आमचो भावोजी’ असे होत असे. यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो ‘भावोजी’, श्रीमंत किंवा प्रसिद्ध व्यक्तीच असला पाहिजे अशी अट नव्हती.

एक लग्नसंबंध जुळणे म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे, दोन कुटुंबांचे संबंध जुळलेले नसत, ते दोन गावांचेही संबंध एकमेकाशी जुळत. कुटुंब या शब्दाची व्याप्ती एवढी मोठी होती. यातून सुरक्षा, आदर आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपलेपणा जपला जात असे.

वाममार्गाकडे झुकणारी व्यक्ती असली तरी तिला आपण कुणाला तरी उत्तरदायी आहोत याची आदरयुक्त भीती होती. ‘किदें रे भावोजी, तुवें अशें करप? लज हाडली आमकां’. (काय भावोजी, तुम्ही असे वागाल अशी अपेक्षा नव्हती. लाज आणलीत आम्हाला.) हे वाक्य कुणाच्याही तोंडून ऐकण्यापूर्वी मरण यावे, अशी भावना होती. एखादे गैरकृत्य केल्यास केवळ स्वत:च्या कुटुंबातील व्यक्तीच नव्हे, तर सासरच्या गावातील कुणीही व्यक्ती आपणास जाब विचारू शकते याची जरब होती.

‘माइंड युवर ओन बिझनस’, अशी समज किंवा ‘तू कोण मला विचारणारा?’, असा प्रतिप्रश्‍न विचारला जात नसे. मुळात अपराध घडल्याची भावना असताना, तसे करण्याचे नीतिधैर्यच नसे. आता आपण इतके निर्ढावलले व गेंड्यालाही लाज वाटावी इतक्या निगरगट्ट कातडीचे बनलो आहोत की, आपण कुठल्याही नात्यास जुमानत नाही.

माझे व्यक्तिस्वातंत्र्य, माझी ‘प्रायव्हेट स्पेस’ यात कुणाचीही दखल आपण खपवून घेत नाही. यामुळेच कुणी इतरांना विचारायासही जात नाही. कशाला स्वत:चाच अपमान करून घ्या? कुटुंबाची व्याप्ती मर्यादित होते तेव्हा सामाजिक संवेदनाही संकुचित होतात. ‘समाज संवेदनाहीन झालाय’, अशी ओरड करणाऱ्या विचारवंतांना याची कितीशी कल्पना आहे?

कुठलेही खापर फोडण्यासाठी ठरावीक स्थानच वापरावे, तसे काही शब्द किंवा शब्दसमूह वारंवार वापरले जातात. उदाहरणार्थ ‘पुरुषप्रधान संस्कृती’, ‘पितृसत्ताक पद्धती’, ‘दुय्यम स्थान’. एक संकल्पना स्पष्ट व स्वच्छ करू इच्छितो. आपली संस्कृती पुरुषप्रधान नाही, ती मूल्यप्रधान आहे.

कुटुंब व्यवस्था
Chhatrapati Shivaji Maharaj: पायदळ; छत्रपतींची सैन्य संघटना

हजारो वर्षांच्या कालखंडात आपण अनेक पद्धतींमधले गुणदोष पाहिले आहेत. त्या अनुभवातून विकसित होत एका निश्‍चित भूमिकेपर्यंत आपण पोहोचलो आहोत. विवाहसुद्धा आपल्याकडे आठ प्रकारचे सांगितले आहेत. पण, त्यातील ब्राह्मविवाहच आपण ग्राह्य धरला आहे. कुटुंबव्यवस्थेमध्ये मातृसत्ताक पद्धतीमधील गुणदोषांपेक्षा पितृसत्ताक पद्धतीत कमी दोष आहेत. म्हणून या पद्धतीला कदाचित महिलांनीही ग्राह्य मानले आहे.

पितृसत्तेमध्ये पिता हा पुरुष असल्याने स्वभावत: तो महिलेवर अन्याय करतो, ही धारणा मुद्दाम रुजवली गेली आहे. एका कुटुंबात कर्त्या पुरुषाकडून जसा स्त्रीवर अन्याय होत असे, तसाच तो कुटुंबातील अन्य पुरुषांवरही होत असे.

कुठल्याच कुटुंबामध्ये स्त्री ही कधीच दुय्यम असत नाही. आता ती स्वत:ला किंवा पुरुष तिला दुय्यम समजत असतील तर तो त्यांचा दोष आहे. माझे वडील किमान चौदा भाषा जाणणारे, अफाट वाचन असलेले, संस्कृत पंडित व व्युत्पन्न होते. माझी आई चौथीपर्यंत शिकलेली होती. वडिलांनी कधी साधे बोटही लावले नाही; आईकडून मार खाल्ला नाही, असे दिवस बालपणी अभावानेच आले. पण, तरीही आईच माझ्यासाठी सर्वस्व होती. कुठल्याही स्थिरस्थावर झालेल्या मुलाला किंवा मुलीला विचारा आईचे स्थान दुय्यम आहे का?

आपण काय केलेय की, नात्यांना एकमेकांच्या विरुद्ध ठेवलेय. स्त्री व पुरुष ही कुटुंबात एकमेकांच्या विरुद्ध नाहीत; ती एकमेकांना पूरक आहेत, असलीच पाहिजेत. एकमेकांची उणीदुणी काढणे, कमतरतेवर बोट ठेवणे म्हणजे संसार किंवा कुटुंब नव्हे. जिथे उणीव आहे, तिथे आपण उभे राहणे म्हणजे संसार, म्हणजे कुटुंब.

स्त्री व पुरुष यांना वर्ग मानून त्यात संघर्ष पेटता ठेवण्याचे काम सातत्याने सुरू आहे. त्यासाठी घडलेल्या घटनांचा, अपवादांचा, शिक्षणाचा, तंत्रज्ञानाचा, कायद्याचा अक्षरश: हत्यारासारखा वापर केला जातोय. विवाहसंस्था, कुटुंबव्यवस्था, पंथ, राष्ट्र आणि खासगी मालमत्ता संपवणे ही मार्क्सने घालून दिलेली पाच मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ज्याचा इमानेइतबारे अवलंब अनेक विचारवंत सातत्याने आजही करत आहेत.

कुटुंबव्यवस्थेत दोष नाहीत, अशातला भाग अजिबात नाही. पण, उत्कृष्ट मूल्ये असणारीही तीच व्यवस्था आहे, हे विसरून चालणार नाही. दोष दाखवणाऱ्याचा हेतू मूल्ये, व्यवस्था नष्ट करण्याचा असतो तेव्हा सावध राहावे लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com