Environment: पर्यावरणप्रेमाचा नवब्राम्हण्यवाद

Environment: भारतासारख्या अजूनही गरीब असलेल्या देशाला पर्यावरण मूलतत्त्ववाद्यांचे नवब्राह्मण्य परवडण्यासारखे नाही.
Environment
EnvironmentDainik Gomantak
Published on
Updated on

दत्ता दामोदर नायक

Environment: विकसनशील देशांतील पर्यावरणवादी चळवळींना विकसित देशांचा छुपा पाठिंबा असतो. हे देश अशा चळवळींना गुप्तपणे आर्थिक रसद पुरवतात, असाही आरोप केला जातो. भारतासारख्या अजूनही गरीब असलेल्या देशाला पर्यावरण मूलतत्त्ववाद्यांचे नवब्राह्मण्य परवडण्यासारखे नाही.

Environment
54th IFFI: कलाभान

रिबी हे सर्वांत मोठे सामाजिक प्रदूषण आहे. ज्या देशात गरिबी निर्मूलन झाले नाही; भूक, कुपोषण, अनारोग्य हे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत; बेकारी आटोक्यात आली नाही, त्या देशात पर्यावरण संरक्षण व संवर्धन हा प्राधान्यक्रम होऊ शकत नाही. मानव व निसर्ग हे द्वैत आपण का मानावे? शेवटी मानव हा देखील निसर्गाचाच भाग आहे, असे का समजू नये?

स्वच्छता, शुद्धी ह्या ब्राह्मण्यी संकल्पना आहेत. सनातनी ब्राह्मण्य एका विशिष्ट परिघा बाहेरील अवकाशाबद्दल कमालीचे असंवेदनशील व बोथट असते. या परिप्रेक्षातून पाहिले तर एकविसाव्या शतकातील पर्यावरणप्रेम हा बुरखा पांघरलेला नवब्राह्मण्यवाद आहे, अशी मांडणी केली तर त्याला तुम्ही छेद कसा देणार?

पत्रकार, वकील, बँक कर्मचारी, सरकारी नोकर हे अर्थव्यवहाराच्या सुरक्षित परिघात येतात. त्यांना गरिबीची झळ बसलेली नसते. महागाई वाढली तर हा सुखवस्तू मध्यमवर्ग कांगावा करतो. शेती हा पर्यावरणाचा प्रमुख भाग आहे, हे विसरले जाते. शेतकऱ्यांना चांगले भाव मिळावा म्हणून अन्नधान्याच्या किमती वाढल्या पाहिजेत हे ह्या वर्गाला मान्य नसते.

कृषी व्यवसायाच्या कल्याणासाठी आपल्या खिशाला झळ बसलेली ह्या वर्गाला नको असते. मध्यमवर्गीयांच्या ह्या पर्यावरणप्रेमी नवब्राह्मण्यवादात शेतीला कसलेच स्थान नसते. लाखो एकर शेते पडीक आहेत ही देखील पर्यावरणीय समस्या आहे, असे हा नवब्राह्मण्यवाद मानत नाही. यांचे पर्यावरण म्हणजे शेतजमीन नव्हे. यांचे पर्यावरण म्हणजे डोंगर, रानेवने आणि नद्या. मनुष्यप्राण्यापेक्षा वन्य प्राण्यांना प्राधान्य देणारे हे नवब्राह्मण्य शूद्राच्या आणि अतिशूद्राच्या, आदिवासींच्या आणि अति मागासवर्गीयांच्या उद्धाराची क्षिती नसलेल्या सनातनी जाती व्यवस्थेचाच परिपाक आहे.

शहरांचे पर्यावरण बकाल होत चालले आहे. सध्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची समस्या सुटलेली नाही. घरांच्या तुटवड्यामुळे झोपडपट्ट्यांनी शहरी जमिनीवर अतिक्रमण केले आहे. ग्रामीण भागातल्या पर्यावरणाबद्दल आक्रमकपणे बोलणारे पर्यावरणप्रेमी शहरातील प्रदूषणाविरुद्ध आवाज उठवत नाहीत. शहरात मोकळ्या जागा असाव्यात, बागा असाव्यात, शहरी जंगल (urban jungle) असावे, (जसे ब्राझीलच्या रिओ द जानेरो शहरात आहे), शहराची कुष्ठरोगाप्रमाणे वाढ होऊ नये म्हणून शहराभोवती हरित पट्टा असावा (जसा लंडन शहराभोवती आहे), आपले जैविक वैविध्य जपण्यासाठी शहरात नसले तरी ग्रामीण भागात बॉटेनिकल गार्डन असावे (न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन भागात 341 हेक्टर म्हणजे 3,41,000 चौरस मीटर सेंट्रल पार्क आहे) यासाठी पर्यावरणवादी चळवळ करत नाहीत.

Environment
कोकणातील बाजारपेठा क्षत्रियांच्या मुळांचा शोध

किंबहुना पर्यावरणप्रेमी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कोणतीच सकारात्मक मोहीम उघडत नाहीत. सरकारी व औद्योगिक प्रकल्पांना विरोध करणे यातच त्यांचा हातखंडा असतो.

भ्रष्टाचार, प्रशासकीय शैथिल्याची झळ सुखवस्तू मध्यमवर्गाला बसत नाही. भ्रष्टाचाराचा झटका व्यापारी व उद्योजक वर्गाला बसतो. त्यामुळे हे प्रशासकीय प्रदूषण दूर व्हावे म्हणून कोण प्रयत्न करणार? पत्रकार आणि संपादक भ्रष्टाचाराबद्दल उदासीन असतात. भ्रष्टाचार विरोधी चळवळी हा इतिहासाचा भाग झाला आहे. अंधश्रद्धा पसरवणे, धार्मिक विद्वेषाची पेरणी करणे, युद्धखोरीची भाषा करणे, दंगे, दंगली, युद्धे घडवून आणणे हा सामाजिक व राजकीय प्रदूषणाचा भाग आहे; पर्यावरणवादा बरोबरच हा नवराष्ट्रवादही नवब्राह्मण्याचे रूप आहे.

पर्यावरणप्रेमी किंवा पर्यावरणतज्‍ज्ञ बनण्यासाठी कोणत्याच पात्रतेची गरज नसते. कोणीही पर्यावरणतज्‍ज्ञ बनतो. पूर्वपक्ष, उत्तरपक्ष, खंडनमंडन आणि अनुमान ही कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करणारी पुरातन तत्त्वप्रणाली कालबाह्य झाली आहे. पूर्वपक्ष म्हणजे आपले म्हणणे प्रतिपादन करणे.

उत्तरपक्ष म्हणजे आपल्या म्हणण्याचा आपणच प्रतिवाद करणे. खंडनमंडन म्हणजे उत्तरपक्षांत मांडलेल्या मुद्द्यांचे खंडन करणे आणि शेवटी अनुमान काढणे ही तर्कशुद्ध, विवेकी मांडणी एखाद्या प्रकल्पाला पर्यावरणीय परिप्रेक्षातून विरोध करताना कोणी करत नाही. हा प्रकल्प आपल्याला नको. का नको, ह्याची कारणमीमांसा करण्याची गरज नाही. नको म्हणजे नको.

अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी ह्यासारखे विकसित देश हे भारत, बांगलादेश, कंबोडिया, इंडोनेशिया यासारख्या विकसनशील देशांच्या विकासाला पर्यावरणाच्या रक्षणाची सबब देऊन विरोध करतात. विकसनशील देशांतील पर्यावरणवादी चळवळींना विकसित देशांचा छुपा पाठिंबा असतो. हे देश अशा चळवळींना गुप्तपणे आर्थिक रसद पुरवतात, असाही आरोप केला जातो. भारतासारख्या अजूनही गरीब असलेल्या देशाला पर्यावरण मूलतत्त्ववाद्यांचे नवब्राह्मण्य परवडण्यासारखे नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com