
Pradhan Mantri Viksit Bharat Rojgar Yojana: आज भारत आपला 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी तरुणाईसाठी एक मोठी घोषणा केली. 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' सुरु करत असल्याची घोषणा त्यांनी केली. या योजनेमुळे देशातील 3.5 कोटींहून अधिक तरुणांसाठी रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली होती. आज स्वातंत्र्यदिनी 1 लाख कोटी रुपयांच्या या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश पुढील दोन वर्षांच्या कालावधीत देशात 3.5 कोटींहून अधिक रोजगार (Employment) निर्मितीला प्रोत्साहन देणे आहे. यापैकी 1.92 कोटी लाभार्थी हे पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात असलेले तरुण असणार आहेत. ही योजना 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीत निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांसाठी लागू असेल.
दरम्यान, या योजनेअंतर्गत खासगी कंपन्यांमध्ये पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकारकडून 15000 प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल. तसेच, रोजगार देणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. योजनेनुसार, ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन 1 लाख रुपयांपर्यंत आहे, ते या योजनेसाठी पात्र असतील.
ही प्रोत्साहनपर रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल. पहिला हप्ता 6 महिन्यांच्या सेवेनंतर, तर दुसरा हप्ता 12 महिन्यांच्या सेवेनंतर आणि कर्मचाऱ्याने आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर मिळेल. बचत करण्याची सवय वाढवण्यासाठी, या प्रोत्साहनपर रकमेचा काही भाग एका निश्चित कालावधीसाठी बचत खात्यात ठेवला जाईल, जो कर्मचारी नंतर काढू शकतील. या योजनेमुळे तरुणांना नोकरी मिळवण्यासोबतच आर्थिक स्थिरता मिळण्यास मदत होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.