पणजी: चुकीच्या आराखड्यांद्वारे चाललेली रस्त्यांची सदोष बांधणी; सहजगत्या उपलब्ध होणारे वाहतूक परवाने यामुळे रस्ते अपघातबळी वाढले आहेत. परदेशाप्रमाणे गोव्यात तंत्रज्ञानाच्या अधिक वापरातून वाहतूक शिस्त आणणे आणि ठराविक काळाने चालकांच्या चाचण्यांच्याअंती वाहतूक परवान्यांचे नूतीनकरण प्रक्रिया बंधनकारक केल्यास अपघात व बळी कमी होऊ शकतात, असे मत माजी आयएएस अधिकारी एल्विस गोम्स व माजी डीआयजी बॉस्को जॉर्ज यांनी व्यक्त केले आहे.
‘गोमन्तक-टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात संपादक संचालक राजू नायक यांनी त्यांची मुलाखत घेतली. द्वयींनी अनेक परिचित मुद्दे लोकांसमोर आणले. व्यवस्थेत काय बदल करणे आवश्यक आहे, हे त्यांनी अत्यंत कमी वेळात प्रभावीपणे स्पष्ट केले. नायक यांनीही पोटतिडकीने बरेच प्रश्न केले. गोवा हे आता पर्यटन राज्य न राहता ‘अपघातांचे राज्य’ बनले आहे. अपघातांचे मूळ कारण म्हणजे रस्त्यांची दुरवस्था, नियोजनाचा अभाव, बेपर्वा वाहतूक आणि यंत्रणांची हलगर्जी असे मुद्दे चर्चेतून समोर आले.
एल्विस गोम्स म्हणाले, गोव्यात ‘रेंट अ कार’ गाड्यांची संख्या अनियंत्रित वाढत आहे. एका व्यक्तीकडे अनेक गाड्या. यावर कोणतेही स्पष्ट धोरण नाही. आरटीओ आणि पोलिस वेगवेगळे काम करतात. दोघांनी समन्वय ठेवत कायदे प्रभावीपणे राबवले पाहिजेत.
१. गिरी महामार्गावर एका सरकारी कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर या घटनेवर भाष्य करताना एल्विस गोम्स म्हणाले, गिरी परिसरातील जोडरस्ता अत्यंत धोकादायक असून अशा रस्त्यांच्या डिझाईनबाबत कोणीही उत्तरदायित्व घेत नाही. एखाद्या इंजिनिअरकडून असा नियोजनशून्य रस्ता झाला, तर त्याच्यावर बंदी आणायला हवी.
२. बॉस्को जॉर्ज म्हणाले की, तरुणांकडे वाहन परवाना असतो, पण त्यामागे शिस्त आणि जबाबदारी नसते. परवाने सहज मिळतात, अभ्यासपूर्वक नाही. अपघातानंतर एक-दोन दिवस लोक बोलतात आणि नंतर सगळं शांत. ही आजची गंभीर स्थिती आहे. परवाने जबाबदरीपूर्वक दिले, तर त्याचे महत्त्व राहील आणि अपघातांवर नियंत्रण देखील राहील.
‘उत्तर गोव्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. पेडे आणि तार जंक्शनवर वाहतूक गोंधळ, अपूर्ण सिग्नलिंग आणि फक्त कॅसिनोचे फलकच लक्ष वेधतात. रस्त्यांचा दर्जा दुर्लक्षित झाला आहे आणि डिझाईनमध्ये गोंधळ आहे’, अशी स्पष्ट टीका एल्विस गोम्स यांनी केली.
बॉस्को जॉर्ज यांनी सिंगापूरचे उदाहरण देत सांगितले की, तेथे रस्त्यावर पोलिस नसून केवळ कॅमेऱ्यांमुळे वाहतूक नियंत्रणात आहे. गोव्यातही कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)-आधारित यंत्रणा आली, तर अनेक समस्या सुटतील. रस्त्यावर चार पोलिस ठेवण्यापेक्षा स्मार्ट तंत्रज्ञान गरजेचे आहे.
१. सरकारकडे निधी आहे, स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी २ हजार कोटी खर्च झाले. त्यातील ३०० कोटी केवळ कॅमेऱ्यांसाठी खर्च झाले, पण हे कॅमेरे गेले कुठे? कमांड सेंटर कोठे आहे? नागरिकांना याची माहिती का दिली जात नाही? असा थेट सवाल एल्विस गोम्स यांनी केला.
२. त्यांनी पारदर्शकतेच्या अभावावर जोर देत सांगितले की, आपण केलेल्या कामाचा व्हिडिओ विभागाकडे देणे बंधनकारक असतानाही कोणीही तो सादर करत नाही आणि जर केला तर तो सार्वजनिक संकेतस्थळावर प्रसिद्ध करायला हवा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.