मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबईसाठीची विमानसेवा नियमितपणे सुरू राहिल्यास कोकणातील पर्यटन वाढीस मोठी चालना मिळेल, असं मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं आहे. चिपी विमानतळाच्या सध्याच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सोमवारी (२१ एप्रिल) मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून चिपी ते मुंबई दरम्यानची विमानसेवा खंडित होत असल्यानं स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. ही सेवा नियमित सुरू ठेवण्यासाठी व फ्लाय ९१ कंपनीच्या अडचणी समजून घेण्यासाठी पालकमंत्री राणे यांनी मंत्रालयात विशेष बैठक बोलावली होती.
या बैठकीला फ्लाय 91 कंपनीचे मुख्य महसूल अधिकारी आशुतोष चिटणीस, एअरपोर्ट डायरेक्टर कुलदीप सिंग, तसेच सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रमुख कॅप्टन जय सदाना उपस्थित होते.
बैठकीत चिपी विमानतळावरून मुंबईसाठीची सेवा कुठल्याही परिस्थितीत नियमित सुरू ठेवण्याचे निर्देश नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
नितेश राणे म्हणाले, "विमानसेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्यात याव्यात. तसंच रात्री लँडिंगला अनुमती मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने राबवावी. या संदर्भात विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन पुढील चर्चा केली जाईल."
यावेळी राणेंनी चिपी विमानतळ परिसराच्या सौंदर्यीकरणावरही चर्चा केली. "विमानतळ परिसर अधिक आकर्षक आणि पर्यटकांसाठी सोयीस्कर व्हावा यासाठी जिल्हा नियोजन विकास समिती (DPDC) मार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल", असं त्यांनी सांगितलं.
चिपी विमानतळाचे हे केवळ सिंधुदुर्ग नव्हे तर संपूर्ण कोकणासाठी पर्यटनदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या विमानतळाचा सर्वांगीण विकास करून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि पर्यटन क्षेत्राला गती देणे, हा शासनाचा प्रमुख उद्देश असल्याचेही राणेंनी बैठकीत सांगितलं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.