रत्नागिरी: कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं जोरदार हजेरी लावली असून, अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसाचा मोठा फटका मुंबई-गोवा महामार्गाला बसला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये सकाळी दरड कोसळल्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सध्या एकेरी वाहतुकीद्वारे मार्ग खुला करण्यात आला आहे.
ही घटना संगमेश्वर तालुक्यात घडली असून, दरड कोसळताना संरक्षक भिंत देखील कोसळली आहे. प्रशासनाने तातडीने युद्धपातळीवर दरड हटविण्याचे काम सुरू केलंय.
या दरम्यान, वाहतुकीसाठी एकेरी मार्ग उघडण्यात आला असला तरी वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर चिखल आणि दगड साचल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे.
याआधी, सोमवारी (१६ जून) लांजा तालुक्यातील वाकेड घाटात देखील दरड कोसळल्यामुळे काही काळ महामार्ग बंद ठेवावा लागला होता. सध्या कोकणातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा जोर कायम असून, पुढील काही दिवसांत आणखी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. विशेषतः शनिवार-रविवारच्या सुट्टीनिमित्त अनेक पर्यटक कोकणात फिरायला येतात. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या या पर्यटकांच्या प्रवासावर मात्र मुसळधार पावसामुळे पाणी फेरवले गेले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर सध्या दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही ठिकाणी मंदावली असून, अनेक पर्यटक आणि स्थानिक प्रवाशांना तासन्तास रस्त्यात अडकून पडावे लागत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही भागांत मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.