Yuvraj Singh Cancer Battle Story: भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा मॅचविनर आणि लाखो तरुणांचा प्रेरणास्थान असलेल्या युवराज सिंगने मैदानावर अनेक अशक्य वाटणारे विजय मिळवून दिले. मात्र, 2011 च्या विश्वचषकादरम्यान तो केवळ प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध नाही, तर आपल्या शरीरात दबा धरुन बसलेल्या जीवघेण्या कॅन्सरशीही लढत होता. नुकताच युवराजने आपल्या त्या काळातील संघर्षाचा असा एक खुलासा केला, जो ऐकून कोणत्याही चाहत्याच्या अंगावर काटा येईल. डॉक्टरांनी त्याला असा इशारा दिला होता की, जर त्याने तातडीने उपचार घेतले नाहीत, तर त्याच्याकडे जगण्यासाठी केवळ 3 ते 6 महिने उरले आहेत.
युवराजने सांगितले की, जेव्हा त्याला सतत खोकला आणि रक्ताच्या उलट्यांचा त्रास होत होता, तेव्हा त्याने डॉ. नितेश रोहतगी यांची भेट घेतली होती. तपासणीनंतर डॉक्टरांनी दिलेला अहवाल धक्कादायक होता. त्याच्या हृदय आणि फुफ्फुसांच्या दरम्यान एक मोठी गाठ वाढली होती. डॉक्टरांनी त्याला अत्यंत गंभीर शब्दात बजावले होते की, "ही गाठ अशा ठिकाणी आहे की तुला कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आता तुझ्याकडे दोनच पर्याय आहेत, एक तर क्रिकेट खेळ किंवा जीव वाचवण्यासाठी तातडीने उपचार घे. जर तू आताच्या आता कीमोथेरपी केली नाही, तर तुझ्याकडे जगण्यासाठी फार तर तीन ते सहा महिने शिल्लक आहेत."
हा काळ युवराजसाठी मानसिकदृष्ट्या प्रचंड खचवणारा होता. अमेरिकेत जगप्रसिद्ध डॉ. आइनहॉर्न (ज्यांनी सायकलपटू लांस आर्मस्ट्राँगवर उपचार केले होते) यांच्याकडून उपचार घेण्यासाठी तो गेला खरा, पण आपल्याला कॅन्सर झाला आहे आणि आपण पुन्हा कधीही हातात बॅट धरु शकणार नाही, हे वास्तव स्वीकारायला त्याला पूर्ण एक वर्ष लागले. युवराज सांगतो की, "क्रिकेट हीच माझी ओळख होती. जर मी क्रिकेट खेळलो नाही, तर मी कोण आहे? मी काहीच नाही, अशी माझी समजूत झाली होती. त्यामुळे शारीरिक वेदनांपेक्षा मानसिकरित्या स्वतःला सावरणे हे माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते." स्वतःला पुन्हा उभे करण्यासाठी त्याला मोठ्या प्रेरणेची गरज होती आणि ती प्रेरणा त्याला त्याच्या खेळाप्रती असलेल्या प्रेमातूनच मिळाली.
मात्र, ज्याला नशिबात हार मानणे मान्य नव्हते, त्या युवराजने मृत्यूच्या दारातून परत येत कॅन्सरला 'क्लीन बोल्ड' केले. सप्टेंबर 2012 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, जे पाहून संपूर्ण क्रीडाविश्व भावूक झाले होते. केवळ पुनरागमनच नाही, तर 2014 चा टी-20 विश्वचषक आणि त्यानंतर 2019 पर्यंत त्याने भारतीय संघासाठी (Team India) अनेक महत्त्वाचे सामने खेळले. मध्यंतरीच्या काळात त्याला अनेकदा संघातून बाहेर जावे लागले, फॉर्मशी झुंज द्यावी लागली, तरीही त्याने जिद्द सोडली नाही. युवराज सिंगची ही कहाणी केवळ एका क्रिकेटपटूची नसून कोणत्याही संकटावर मात करुन पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणाऱ्या एका खऱ्या योद्ध्याची आहे, जी येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.