नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट विश्वात सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहेत. विशेषतः गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून, विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्यासाठी भाग पाडले जात असल्याच्या अफवांनी सोशल मीडियावर जोर धरला होता. मात्र, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून सत्य परिस्थिती समोर आणली आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील संबंध ताणलेले असल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. "मी त्यांना कधीही भांडताना पाहिलेले नाही. उलट त्यांच्यामध्ये एक सुदृढ आणि आदराचे नाते आहे. लोकांना बाहेरून काहीही वाटत असले, तरी विराट नेहमीच संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे," असे सैकिया यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना वनडे (एकदिवसीय) संघातून बाहेर काढण्याची योजना गौतम गंभीर आखत असल्याचे वृत्तही काही दिवसांपूर्वी आले होते. यावर बोलताना बीसीसीआय सचिवांनी सांगितले की, निवड समिती किंवा बोर्डाच्या कोणत्याही बैठकीत अशा प्रकारचा प्रस्ताव किंवा चर्चा झालेली नाही. या निव्वळ अफवा असून यामध्ये कोणतेही तथ्य नाही. गंभीरने कधीही या दोन दिग्गज खेळाडूंना संघातून वगळण्याबाबत भाष्य केलेले नाही.
बोर्डाने हे देखील स्पष्ट केले की, सध्या आमचे संपूर्ण लक्ष संघाच्या कामगिरीवर आणि येणाऱ्या निकालांवर आहे. "अनेक लोक चुकीच्या बातम्या पसरवत आहेत, आम्ही अशा गोष्टींवर भाष्य करणार नाही. मैदानात आम्हाला कोणतेही मतभेद दिसत नाहीत आणि संघ व्यवस्थापन सध्या सकारात्मक वातावरणात काम करत आहे," असे म्हणत सैकिया यांनी 'रो-को' (रोहित-कोहली) जोडीच्या भविष्याबाबत चाहत्यांना दिलासा दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.