अहमदाबाद: भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज अभिषेक शर्मा याला टी-२० विश्वकरंडकातील साखळी फेरीतील तीन लढतींमध्ये अपयशाचा सामना करावा लागला. या तीनही लढतींमध्ये तो शून्यावरच बाद झाला. अभिषेक शर्माच्या फलंदाजीबाबत भारताचे माजी कर्णधार व सध्याचे समालोचक सुनील गावसकर यांनी आपले मत व्यक्त केले.
तसेच त्याला मोलाचा सल्लाही दिला. ते म्हणाले, टी-२० विश्वकरंडकात आक्रमक फलंदाजी करण्याचे दडपण अभिषेक शर्मावर येत आहे. त्याने डावाच्या सुरुवातीला आडव्या बॅटने खेळण्याचे टाळावे.
सुनील गावसकर याप्रसंगी नमूद करतात, की अभिषेक शर्मा हा एक चांगला क्रिकेटपटू आहे. त्याच्यावर अपेक्षांचे ओझे आहे.
खेळपट्टीवर वेळ घालवावा
सुनील गावसकर यांनी अभिषेक शर्मा याला सल्ला देताना पुढे म्हटले, की अभिषेक शर्माकडे वेगवेगळे फटके खेळण्याची क्षमता आहे. सध्या त्याने खेळपट्टीवर वेळ घालवणे गरजेचे आहे. पहिल्या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारण्याचा प्रयत्न त्याने करू नये. एखादा आक्रमक फटका खेळल्यास ठीक आहे; पण आडव्या बॅटने खेळण्याचा अट्टहास त्याने करू नये.
एकेरी धावा काढत श्रीगणेशा कर...
सुनील गावसकर पुढे सांगतात, की प्रत्येक फलंदाजाला सुरुवातीला एका धावेची गरज असते. त्यामुळे अभिषेक शर्मा याने सुरुवातीला एक धाव घ्यायला हवी. अशा परिस्थितीत चार निर्धाव चेंडू खेळले तरी चालतील. त्याने एखाददुसरे षटक शांतपणे फलंदाजी करायला हवी. त्यानंतर आपला नैसर्गिक खेळ तो करू शकतो.
वरुणच्या गोलंदाजीवर अवलंबून
सुनील गावसकर यांनी वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीचे कौतुक केले. ते म्हणाले, की जसप्रीत बुमराने भारताच्या गोलंदाजीची सुरुवात होईल. हार्दिक पंड्याने एखाददुसरी विकेट मिळवली तर चांगले असेल; पण भारताचा गोलंदाजी विभाग वरुण चक्रवर्तीवर अवलंबून असणार आहे. सुपर-३ फेरीमध्ये प्रतिस्पर्धी त्याच्या गोलंदाजीचा कसा सामना करताहेत, हे पाहणे रंजक ठरेल. अक्षर पटेलही संघात असण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.