Ravi Shastri Big Statement On India Loss: टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात टीम इंडियाला 76 धावांच्या मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच पराभव असून यामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पराभवामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग आता खडतर झाला असून चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मात्र, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि दिग्गज खेळाडू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी या पराभवावर एक अत्यंत धक्कादायक आणि तितकेच सकारात्मक विधान केले आहे. शास्त्री यांच्या मते, टीम इंडिया हा सामना हारला याचा त्यांना आनंद झाला असून मोठ्या सामन्यांपूर्वी असा धक्का बसणे संघासाठी गरजेचे होते.
आयसीसीच्या रिव्ह्यू शोमध्ये बोलताना रवी शास्त्री यांनी स्पष्ट केले की, भारताला हा झटका स्पर्धेच्या सुरुवातीलाच बसला हे एका अर्थाने चांगलेच झाले. यामुळे सुपर-8 मधील उर्वरित दोन महत्त्वाच्या सामन्यांसाठी टीम इंडियाला आपली रणनीती अधिक अचूकपणे आखता येईल. विशेषतः दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध, ज्याचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे, त्यांच्याकडून मिळालेला हा पराभव भारतीय खेळाडूंना जमिनीवर आणणारा ठरेल.
शास्त्री यांच्या मते, या धक्क्यामुळे संघ व्यवस्थापन आपल्या गेम प्लॅनवर पुन्हा विचार करेल आणि संघात योग्य बदल करुन मैदानात उतरेल. टीम इंडिया या अनुभवातून नक्कीच शिकेल आणि कोणत्याही गोष्टीला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
संघातील बदलांविषयी आणि प्लेइंग इलेव्हनच्या संयोजनाबद्दल बोलताना शास्त्री यांनी अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी कोणाला संधी मिळावी, यावरही भाष्य केले. त्यांच्या मते, कठीण परिस्थितीत अनुभवाची मोठी गरज असते, त्यामुळे अक्षर पटेलला संघात स्थान मिळायला हवे.
शास्त्री यांनी एक पाऊल पुढे टाकत असेही सुचवले की, शक्य असल्यास या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान देऊन गोलंदाजीचा एक जास्तीचा पर्याय उपलब्ध ठेवावा. वरुण चक्रवर्तीसारख्या गोलंदाजाचा एखाद्या दिवशी फॉर्म नसेल, तर संघाकडे बॅकअप असणे अत्यंत आवश्यक आहे. सातव्या किंवा आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी असूनही जर संघ टी-20 मध्ये चांगली कामगिरी करु शकत नसेल, तर कुठेतरी गडबड आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
शास्त्री यांनी गोलंदाजीच्या पर्यायावर जोर देताना एक कठोर निर्णय घेण्याचेही सुचवले आहे. अतिरिक्त गोलंदाज खेळवण्यासाठी गरज पडल्यास रिंकू सिंहसारख्या आक्रमक फलंदाजाला संघातून बाहेर बसावे लागेल. मात्र, जर रिंकू सिंहला खेळवायचेच असेल, तर त्याला एखाद्या विशेषज्ञ फलंदाजाच्या जागी संधी द्यायला हवी, जेणेकरुन गोलंदाजीच्या पर्यायांवर परिणाम होणार नाही. आता सुपर-8 मधील उर्वरित दोन सामन्यांत टीम इंडिया (Team India) शास्त्रींनी सुचवलेले बदल करते का आणि पराभवाचा हा धक्का पचवून कशा प्रकारे दमदार पुनरागमन करते, याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.