Jasprit Bumrah vs Arshdeep Singh Record: टी-20 विश्वचषक 2026 चा थरार आता एका अशा वळणावर आला आहे, जिथे केवळ दोन देशांमधील संघर्षच पाहायला मिळणार नाही, तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एका सुवर्ण अध्यायाची भर पडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 22 फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज होणाऱ्या सुपर-8 लढतीत भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येत असतानाच संपूर्ण जगाचे लक्ष भारतीय गोलंदाजीच्या दोन प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह यांच्यावर खिळलेले असेल. हे दोन्ही गोलंदाज सध्या केवळ प्रतिस्पर्धी फलंदाजांना बाद करण्यासाठीच नव्हे, तर विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा नंबर-1 गोलंदाज बनण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत आहेत.
भारतीय क्रिकेटच्या आतापर्यंतच्या टी-20 विश्वचषक प्रवासात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 24 सामन्यांत 32 बळी घेत अग्रस्थान कायम राखले आहे. मात्र, आता बुमराह आणि अर्शदीप या दोघांनीही त्याच्या या विक्रमाच्या अगदी जवळ मजल मारली आहे. सध्या या दोन्ही वेगवान गोलंदाजांच्या नावावर टी-20 विश्वचषकात प्रत्येकी 30-30 बळी नोंदवले गेले आहेत. याचाच अर्थ असा की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात जो गोलंदाज किमान 3 बळी घेईल, तो अश्विनला मागे टाकून टी-20 विश्वचषकात भारतासाठी (India) सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरेल.
हा विक्रम केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नाही, तर भारतीय गोलंदाजीच्या वर्चस्वाचा तो एक पुरावा असेल. 27 वर्षीय अर्शदीप सिंहने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेण्याचा मान मिळवला आहे. आता विश्वचषकाच्या मोठ्या व्यासपीठावरही आपली मोहोर उमटवण्यासाठी तो सज्ज आहे. दुसरीकडे, अनुभवी जसप्रीत बुमराहचा अचूक यॉर्कर आणि भेदक मारा दक्षिण आफ्रिकेच्या (Jasprit Bumrah) फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरु शकतो. विशेष म्हणजे, अष्टपैलू हार्दिक पांड्याही 29 बळींसह या शर्यतीत फार मागे नाही, त्यामुळे भारतीय गोलंदाजांमध्ये सुरु असलेली ही निकोप स्पर्धा चाहत्यांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरणार आहे.
जागतिक स्तरावर नजर टाकली तर बांगलादेशच्या शाकिब अल हसनने 43 सामन्यांत 50 बळी घेत आपले वर्चस्व राखले आहे. सध्या टी-20 विश्वचषकाच्या टॉप-5 जागतिक गोलंदाजांच्या यादीत एकाही भारतीयाचा समावेश नाही. मात्र, बुमराह आणि अर्शदीप ज्या लयीत आहेत, ते पाहता लवकरच भारतीय गोलंदाज या जागतिक क्रमवारीतही आपले स्थान निश्चित करतील अशी चिन्हे दिसत आहेत. अहमदाबादच्या ऐतिहासिक खेळपट्टीवर प्रथम कोण बाजी मारणार आणि अश्विनचा 32 बळींचा विक्रम मोडीत काढून भारताचा 'नंबर-1' गोलंदाज कोण ठरणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.