ताश्कंद (उझबेकिस्तान): महेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखालील भारताच्या २० वर्षांखालील फुटबॉल संघाने तब्बल २० वर्षांनंतर एएफसी आशिया कप मुख्य स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. ‘ब’ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी बांगलादेशचा ३-० असा धुव्वा उडविला.
सीरियाविरुद्धच्या विजयानंतर भारताला यजमान उझबेकिस्तानकडून हार पत्करावी लागली होती. भारताचे तीन सामन्यांतून सहा गुण झाला व त्यांना गटात दुसरा क्रमांक मिळाला. तिन्ही सामने जिंकलेल्या उझबेकिस्तानने नऊ गुणांसह गटात अव्वल स्थान मिळविले.
यजमान संघाविरुद्ध रविवारी पराभूत झाल्यामुळे सीरियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. ‘ब’ गटातून उझबेकिस्तान व भारताने मुख्य स्पर्धेत जागा मिळविली. आठ गटातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम सात संघात भारताने स्थान पटकावले.
एएफसी २० वर्षांखालील आशिया कप २०२७ मध्ये २४ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत चीनमध्ये खेळली जाईल. या स्पर्धेतील अव्वल चार संघ २०२७ मध्ये होणाऱ्या फिफा २० वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
रविवारी बांगलादेशविरुद्धच्या विजयात भारतासाठी डॅनी मेईतेई लैश्राम याने २५व्या, विशाल यादव याने ६०व्या, तर बदली खेळाडू महंमद अरबाश याने ७९व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.