भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आपल्या दीर्घ कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने हा निर्णय जाहीर केला. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय संघात त्याला संधी मिळत नव्हती. आगामी श्रीलंका कसोटी मालिकेसाठीही त्याची निवड न झाल्यानंतर पुनरागमनाच्या आशा मावळल्या आणि अखेर त्याने निवृत्तीचा मार्ग स्वीकारला.
अजिंक्य रहाणे गेल्या काही काळापासून भारतीय संघाबाहेर होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने खेळत असतानाही त्याला पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नाही. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा झाल्यानंतरही त्याचे नाव नसल्याने त्याच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर रहाणेने सोशल मीडियावर भावनिक संदेश शेअर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अखेरचा निरोप अजिंक्य रहाणे म्हणाला, प्रत्येक प्रवासाला एक सुरुवात आणि एक निश्चित शेवट असतो, हे आयुष्याचे अटळ सत्य असल्याचे सांगत त्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत योग्य वेळ साधण्यावर भर दिल्याचे सांगत रहाणे म्हणाला की, आता पुढील आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय आपण मनापासून घेत असल्याचे त्याने स्पष्ट केले.
रहाणेचे नाव भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांमध्ये घेतले जाते. तांत्रिकदृष्ट्या भक्कम फलंदाजी, संयम आणि परदेशी खेळपट्ट्यांवर धावा करण्याची क्षमता यामुळे त्याने स्वतःची खास ओळख निर्माण केली. नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत त्याने भारतीय संघाचे नेतृत्वही केले आणि अनेक संस्मरणीय विजय संघाला मिळवून दिले.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी विजय हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टप्पा मानला जातो. मेलबर्न कसोटीतील शतक आणि त्यानंतर गाबा येथे मिळवलेला ऐतिहासिक विजय भारतीय क्रिकेटच्या सुवर्णक्षणांपैकी एक ठरला.
विशेष म्हणजे, रहाणेने भारतासाठी सर्वप्रथम टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑगस्ट 2011 मध्ये त्याने पहिला टी-20 सामना खेळला. त्यानंतर तो एकदिवसीय आणि कसोटी संघाचा भाग बनला. मात्र, कसोटी क्रिकेटमध्येच त्याची कारकीर्द सर्वाधिक यशस्वी ठरली. शांत स्वभाव, जबाबदार फलंदाजी आणि कठीण परिस्थितीत संघाला सावरण्याची क्षमता यामुळे तो संघाचा विश्वासार्ह खेळाडू बनला.
अजिंक्य रहाणेने भारतासाठी तिन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारांत प्रतिनिधित्व केले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 85 सामने खेळत 5,077 धावा केल्या. त्याच्या नावावर 12 शतके आणि 26 अर्धशतके आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 90 सामन्यांत 2,962 धावा करत 3 शतके आणि 24 अर्धशतके झळकावली. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 20 सामने खेळून 375 धावा केल्या, ज्यामध्ये एक अर्धशतक नोंदवले.
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली असली तरी भारतीय क्रिकेटसाठी त्याने दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. संकटाच्या काळात संघाला सावरणारा फलंदाज, शांत आणि संयमी कर्णधार तसेच परदेशातील कठीण मालिकांमध्ये भारतासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा खेळाडू म्हणून त्याचे नाव कायम आदराने घेतले जाईल. त्याच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेटमधील एका यशस्वी आणि प्रेरणादायी पर्वाचा शेवट झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.