मुंबई: नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला याची घोषणा झाल्यापासून मुख्यत: सांगली आणि कोल्हापुरातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. अधिवेशन सुरु असताना महामार्गाला विरोध करणारे शेतकरी आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. याबाबत विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला असता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महामार्ग का गरजेचा आहे याची माहिती दिली.
हजारो शेतकरी आझाद मेैदानवार शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करत आहेत. १२ जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाला शेतकरी विरोध करतायेत. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात हा महामार्ग होणार नाही, अशी घोषणा केली होती. जनतेचा विरोध होत असताना महामार्ग का? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, सरकारला हा महामार्ग हवा आहे पण लादायचा नाही, असे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे बोलताना कोल्हापुरातील हजारो शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्ग व्हावा म्हणून निवदेन दिल्याचेही सभागृहात सांगितले. तसेच, वर्धा, यवतमाळ, सांगली जिल्ह्यातून देखील शेतकऱ्यांनी हा मार्ग व्हावा, यासाठी आम्ही जागा द्यायला तयार आहोत, मार्ग तुम्ही रद्द करु नका, अशा प्रकारचे निवेदन दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शक्तिपीठ महामार्ग केवळ अस्थेच्या केंद्रांना जोडणारा महामार्ग नाही तर मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचे जीवनमान बदलणारा मार्ग आहे, असे फडणवीस म्हणाले. केवळ मराठवाडाच नव्हे तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा देखील फायदा होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग देखील विकासासाठी महत्वाचा मार्ग ठरेल, असे फडणवीस म्हणाले. कोल्हापुरातून पाऊण ते एक तासांत मोपा विमानतळावर जाता येईल, यामुळे वाणिज्य क्षेत्रात लाभ होणार नाही का? परिवर्तन होणार नाही का? त्यामुळे हा महामार्ग सरकारचा अट्टाहास नाहीये तर, महाराष्ट्राच्या विकासाठी महत्वाचा महामार्ग आहे, असे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. तसेच, विरोधात निघणाऱ्या मोर्चा सारखा महामार्गाला समर्थन देणारा मोर्चा शेतकरी काढणार आहेत, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन देखील फडणवीस यांनी यावेळी दिले. नागपूर रत्नागिरी महामार्ग असताना तसेच, त्याला जोडणारे इतर मार्ग असताना शक्तीपीठ कशासाठी? असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला. शिवाय मोपाला जाण्यासाठी आजरामार्गे चौपदरीकरण झाल्याने दोन ते अडीच तासांत जाता येते असेही पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. आणि आंदोलन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, अशी विनंती पाटील यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.