पणजी : कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मंत्रिमंडळातील जागेवर कोण, याचे गूढ आणखीन वाढले आहे. या जागेचे दावेदार मानले जाणारे कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना महामंडळांची अध्यक्षपदे दिली गेल्याने मंत्रिमंडळात आता कोणाला संधी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू झाली आहे.
मंत्रिपदासाठी कायम चर्चेत असलेले आमदार मायकल लोबो किंवा संकल्प आमोणकर यापैकी एकाची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, सरकारने गुरुवारी लोबो यांना राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे (जीएसआयडीसी) आणि आमोणकर यांना मलनिस्सारण महामंडळाचे अध्यक्षपद दिले. त्यामुळे माजी कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार, याबाबतचे गूढ वाढले आहे.
सरकारने विद्यमान, माजी आमदार तसेच पदाधिकारी मिळून नऊजणांची विविध महामंडळे आणि आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली. त्यात विद्यमान आमदार मायकल लोबो यांची ‘जीएसआयडीसी’च्या अध्यक्षपदी नेमणूक केली. ‘जीएसआयडीसी’चे अध्यक्षपद मुख्यमंत्री स्वत:कडे ठेवत असतात. परंतु, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी हे पद तत्कालीन आमदार तथा विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिले होते.
डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून हे पद स्वत:कडेच ठेवले होते. परंतु, आता मात्र त्यांनी हे पद मायकल लोबो यांच्याकडे सोपवले. दुसरीकडे रवी नाईक यांच्या निधनानंतर त्यांचे मंत्रिपद स्वत:ला मिळेल, अशी आशा बाळगून असलेल्या आणि याआधी ‘बाल भवन’चे अध्यक्षपद नाकारलेल्या संकल्प आमोणकर यांच्याकडे मलनिस्सारण महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या या दोन आमदारांची महामंडळांवर वर्णी लावल्याने आता मंत्रिमंडळातील रिक्त जागी मुख्यमंत्री कुणाची वर्णी लावणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
रवी नाईक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदी तत्काळ त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र रितेश नाईक यांची वर्णी लावावी आणि सहा महिन्यांत होणाऱ्या फोंडा पोटनिवडणुकीत त्यांना निवडून आणावे, अशी मागणी अखिल गोवा भंडारी समाजाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याकडे केली आहे.
परंतु, भंडारी समाजाच्या या मागणीबाबत मुख्यमंत्री आणि दामूंनीही आतापर्यंत तशाप्रकारचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. फोंडा पोटनिवडणुकीत उमेदवाराची निवड पक्षाच्या प्रक्रियेनुसार आणि रिक्त मंत्रिपद कुणाला द्यायचे, याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत योग्यवेळी घेतील, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
१ मंत्रिमंडळातील रिक्त जागी माजी मंत्री नीलेश काब्राल यांची वर्णी लावण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
२ गत लोकसभा निवडणुकीआधी दक्षिण गोव्यातील मतांचे राजकारण लक्षात घेत भाजपने नीलेश काब्राल यांना मंत्रिपदावरून हटवून त्यांच्याजागी ज्येष्ठ आमदार आलेक्स सिक्वेरा यांची नेमणूक केली.
३ परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे सिक्वेरा यांनी काहीच महिन्यांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याजागी दिगंबर कामत यांना स्थान दिले.
४ तरीही पर्यावरण आणि कायदा ही दोन खाती मुख्यमंत्र्यांनी अजूनही स्वत:कडेच ठेवली आहेत.
५ काब्राल यांनी यापूर्वी या दोन्ही खात्यांना योग्य न्याय दिला असल्याने पुन्हा काब्राल यांना मंत्रिमंडळात घेऊन ही खाती त्यांच्याकडेच सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात, असाही अंदाज बांधला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.