सावईवेरे: वेरे-वाघुर्मे ग्रामपंचायत क्षेत्रातील श्री खामिणी मंदिर ते तळे-बोणये या भागात अवघ्या आठ महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेला रस्ता डांबरीकरणासह मधोमध खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाबाबत स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली असून, लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला रस्ता इतक्या कमी कालावधीत खचल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
श्री खामिणी मंदिराच्या मागील बाजूस कुळागर असून तेथे सुमारे आठ ते दहा घरे आहेत. या घरांपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने खामिणी देवस्थानच्या समोरील भागातून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काँक्रीटच्या संरक्षक भिंती उभारून बांधकाम खात्याच्या माध्यमातून रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते.
या रस्त्याचे काम डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण झाले होते. त्यानंतर ४ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, अवघ्या आठ महिन्यांतच रस्त्याचा मधला भाग मोठ्या प्रमाणात खचल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या काही भागात भेगा पडून तो खचण्यास सुरुवात झाली. दोन दिवसांपूर्वी रस्त्याचा मधला भाग मोठ्या प्रमाणात खचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर बांधकाम खात्याने कंत्राटदारामार्फत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे तीन मीटर उंचीच्या काँक्रीटच्या संरक्षक भिंती आहेत. कुळागराच्या बाजूची एक भिंत काही प्रमाणात कलंडल्याने त्या ठिकाणाहून पावसाच्या पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाला. रस्त्याच्या मधोमध मातीचा भराव टाकण्यात आला होता. पावसाच्या पाण्यामुळे हा मातीचा भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने रस्त्याच्या डांबरीकरणाला तडे गेले आणि मधला भाग खचला.
माती हटविण्याचे काम सुरू
गेल्या दोन दिवसांपासून कंत्राटदारामार्फत जेसीबीच्या साहाय्याने खचलेल्या भागातील माती हटविण्याचे काम सुरू आहे. हटविलेली काही माती संरक्षक भिंतीलगत टाकण्यात आली आहे. मात्र, ही माती पुन्हा पावसाच्या पाण्याबरोबर कुळागराच्या भागात पसरण्याची शक्यता असल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
कामाच्या दर्जाबाबत सखोल चौकशी करण्याची नागरिकांची मागणी
या मार्गावरून विरळ स्वरूपात वाहनांची वाहतूक होत असली तरी रस्ता खचल्यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नव्याने बांधण्यात आलेला रस्ता अवघ्या आठ महिन्यांत खचल्याने कामाच्या दर्जाबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.