म्हापसा: गोव्याच्या पर्यटन नकाशावरील गजबजलेल्या वागातोर समुद्रकिनाऱ्यावर यंदा ‘ऑलिव्ह रीडले’ समुद्री कासवांनी तब्बल १० वेळा किनाऱ्यावर येत सुमारे १,१६० अंडी घातली. मात्र, किनाऱ्यावर स्वतंत्र कासव संवर्धन केंद्र नसल्याने ही अंडी मोरजी येथील संवर्धन केंद्रात हलवावी लागली आणि त्यापैकी केवळ ३३८ पिल्लांनाच सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात यश आले. त्यामुळे वागातोर येथे तातडीने स्वतंत्र कासव संवर्धन केंद्र उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरवर्षी ऑक्टोबर ते एप्रिलदरम्यान ‘ऑलिव्ह रीडले’ कासवे प्रजननासाठी गोव्याच्या किनाऱ्यांवर येतात. यंदाच्या हंगामात १० कासवांनी वागातोर किनाऱ्यावर सुरक्षित घरटी केली; तर १० ते १२ वेळा कासवे किनाऱ्यावर आली, मात्र अंडी न घालताच परतल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपासून वागातोर किनाऱ्यावर कासवांचे आगमन होत असतानाही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत होते. अखेर ५-६ वर्षांपूर्वी हणजूण-कायसुव जैवविविधता व्यवस्थापन समितीने हा मुद्दा सातत्याने लावून धरल्यानंतर वनखात्याने येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली.
हणजूण-कायसुव जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश नाईक यांनी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना सांगितले की, ‘रात्रीच्या वेळी पर्यटकांची वाढती गर्दी, प्रखर दिवे, वाहनांचे हेडलाईट्स आणि कर्णकर्कश संगीत यामुळे कासवे घाबरून जातात. त्यामुळे अनेक कासवे अंडी न घालताच परत फिरत आहेत.
वागातोर येथेच ‘हॅचरी’ असती, तर १,१६० पैकी तब्बल ८२२ अंडी खराब झाली नसती. अंडी मोरजीला नेताना वातावरणातील बदल आणि प्रवासाचा परिणाम त्यांच्यावर झाला असावा. गेल्या चार वर्षांपासून वागातोर किनाऱ्याला ‘कासव संवर्धन क्षेत्र’ घोषित करण्यासाठी विविध खात्यांशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगत, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याची खंतही रमेश नाईक यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.