पाळी: उसगावच्या चौपदरी पुलावरील पथदीप पेटत नसल्याने रात्रीच्या वेळेला या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. या पुलावरून अविरत वाहतूक सुरू असते. मात्र, पथदीप पेटत नसल्याने पूल आणि जोडरस्त्यावर अंधार पसरलेला असतो. संबंधित यंत्रणेने हे पथदीप दुरुस्त करून रात्रीच्या वेळेचा हा अंधार दूर करावा, अशी मागणी वाहनचालक व स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
उसगाव व पाळी हे उत्तर आणि दक्षिण भाग जोडणारा महत्त्वाचा उसगावचा चौपदरी पूल काहिसा दुर्लक्षित झाला आहे. वास्तविक या भागातील खाण व्यवसाय ज्यावेळेला जोरात सुरू होता, त्यावेळेला म्हादई नदीवर हा चौपदरी पूल उभारला होता. पूर्वीच्या उसगावच्या एकेरी वाहतुकीच्या पुलामुळे या भागात कायम वाहतूक कोंडी व्हायची.
विशेष म्हणजे खनिजवाहू ट्रकांची मोठी वाहतूक त्यावेळेला होत असे, त्यामुळे या ट्रकांच्या गर्दीत इतर वाहने अडकून पडायची. या वाहतूक कोंडीत शाळा, विद्यालयातील विद्यार्थी तसेच रोज कामाधंद्याला जाणारे लोक अडकून पडत असल्याने त्यातच खनिजवाहू ट्रक अडकल्यामुळे हा व्यवसाय निर्धोकपणे सुरू रहावा यासाठी खाण कंपन्यांच्या संघटनेने त्याकाळी हा पूल उभारला आणि २०११ साली या चौपदरी पुलाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे येथील अंदाधुंद खनिज वाहतूक बंद पडली. त्यामुळे हा पूल आता सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी कार्यरत झाला.
खनिज वाहतुकीचा मूळ उद्देश बाजूला पडल्याने खाण कंपन्यांच्या संघटनेकडून या पुलाकडे दुर्लक्षच झाले होते. त्यानंतर बऱ्याच काळानंतर या पुलाची रंगरंगोटी करण्यात आली आणि पथदीप बसवण्यात आले होते. मात्र, आता हे पथदीप पेटत नसल्याने पुलावर आणि जोडरस्त्यावर कायम अंधार पसरलेला असतो. संबंधित यंत्रणेने या प्रकाराकडे त्वरित लक्ष देऊन पुलावरील पथदीप दुरुस्त करावेत, अशी मागणी केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.