पणजी: युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभाविरोधात सुरू असलेल्या चिंबल ग्रामस्थांच्या उपोषणाचा ४३ वा दिवस ठरला. मागील आठवड्यात सरकारला दिलेल्या सात दिवसांची मुदत संपली असल्याने ग्रामस्थ आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. परंतु सोमवारी मुख्य सचिवांकडे चर्चेकरिता वेळ मागितली जाणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
कदंब पठारावर प्रस्तावित वरील दोन्ही प्रकल्पांना चिंबलच्या ग्रामस्थांनी विरोध केला आणि आपले साखळी उपोषण सुरू केले. त्याशिवाय तोयार तलावाच्या प्रभाव क्षेत्राचे सर्वेक्षणही मागणीनुसार केले गेले असले तरी ग्रामस्थांनी त्यांच्या अहवालावर नापसंती व्यक्त केली आहे. त्याचबरोबर मागील आठवड्यात सरकारकडे ज्या मागण्या केल्या होत्या, त्या मागण्यांना सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी आता आंदोलनाची दिशाच बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
४३ दिवस उपोषण करणाऱ्या चिंबल ग्रामस्थांच्या आरोग्यावर सध्या हवामान, धूळ व उष्म्याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये चार महिला व दोन पुरुष उपोषणकर्त्यांना विविध आजारांनी ग्रासले असून, काहींच्या तक्रारी बळावल्या असल्या तरी ते हिमतीने खचलेले नाहीत.
महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रस्त्याच्या बाजूला उभारलेल्या मंडपात उपोषणकर्ते दररोज सकाळी येऊन संध्याकाळपर्यंत उपोषण करीत आहेत. सायंकाळी सहानंतर अल्पोपहार घेत उपवास सोडण्यात येतो.
मात्र, सर्व्हिस रस्त्यावरून ये–जा करणाऱ्या भरधाव वाहनांमुळे उडणारी धूळ, जाणवणारा उष्मा व बदलते हवामान याचा थेट परिणाम उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर होत आहे. साखळी उपोषण पद्धतीमुळे काहींना विश्रांती मिळत असली, तरी सध्या उपोषणाची पद्धत बदलून दोन दिवसांआड उपोषण केले जात आहे. प्रारंभी सर्वच ग्रामस्थ एकत्र उपोषणास बसल्याने विशेषतः महिलांच्या घरसंसाराच्या वेळापत्रकावर परिणाम झाला होता. काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील वैद्यकीय पथकाने उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी केली होती.
गोवा राज्य पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) प्रकल्प स्थलांतर करणार असल्याचे जे पत्र दिले होते, त्यावरही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पंचायतीला बांधकाम परवाना शुल्क म्हणून जे एक कोटी रुपये दिले होते, ती रक्कमही अजूनही सरकारने का परत घेतली नाही, याबाबत ग्रामस्थांकडून संशय व्यक्त झाला आहे.
त्याशिवाय जीटीडीसीचे सल्लागार प्रमोद बदामी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तोयार तलावाच्या सर्वेक्षणाच्या केलेल्या अहवालावरही त्यांनी शनिवारच्या बैठकीत ग्रामस्थांनी नापसंती व्यक्त केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे.
विष्णू कुंकळकर (७३) मधुमेहाचा त्रास वाढला असून, वयाची सत्तरी ओलांडली तरी उपोषणकर्त्यांना सतत पाठबळ.
सॅबिस्तीव रुझारियो (वय ७८) यांनी सांगितले की, थंडी, तापासारखे आजार होऊन गेले; धूळ व उष्म्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे.
वृद्धापकाळामुळे शरीर थकलेले असले तरी आंदोलनात सक्रिय सहभाग. सातत्याने उन्हात बसल्याने त्वचा काळी पडल्याचे लता शिरोडकर सांगतात.
शेवंती शिरोडकर (वय ५८) व विकिता कुंकळकर : दररोज उपोषण स्थळापर्यंत ये–जा आणि दिवसभर उपवासाचा परिणाम जाणवत आहे.
रक्तदाब वाढ, कॅल्शियमची कमतरता व हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे थकवा. मात्र, वैद्यकीय उपचारांपेक्षा उपोषणाला प्राधान्य. दिले, असे उपोषण नेते अजय खोलकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.