मोरजी : उगवे येथील महादेव मंदिर ते देवळी दरम्यान असलेल्या मोठ्या वळणाजवळील रस्ता मोठ्या प्रमाणात खचला असून, त्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. अनेक दिवस उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. विशेषतः गणेश चतुर्थी, माऊली देवीचा सप्ताह, दिंडी व पावळी सोहळ्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
याबाबत ग्रामस्थ उदय महाले यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या मार्गावर दररोज अनेक वाहनांची वर्दळ असते. रस्ता खचल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी महाले यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही. पावसाळा तोंडावर आलेला असताना या रस्त्याची अवस्था अधिकच धोकादायक बनली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.