फोंडा: धो धो कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता शेकडोंच्या संख्येने एकवटलेल्या आदिवासी बांधवांनी येत्या विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण द्या, अन्यथा भाजपची साथ सोडण्याचा इशारा दिला.
‘आदिवासींशिवाय सत्तेवर येऊन दाखवाच’, असे थेट आव्हान आदिवासी बांधवांनी तुडुंब भरलेल्या म्हार्दोळच्या महासभेत दिले. ‘उटा’ या आदिवासींच्या संघटनेतर्फे ही महासभा आयोजित केली होती.
पणजीतील आझाद मैदानावरील महासभेला सरकारने परवानगी नाकारल्यानंतर म्हार्दोळातील आझाद मैदानावर हा महामेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; पण मेळाव्याचे रूपांतर महासभेत झाले. तीन दिवसांपूर्वी मवाळ धोरण घेणारे आदिवासी नेते आक्रमक झाले.
राजकीय आरक्षणासाठी पाठपुरावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करताना सरकारवर दुगाण्याही झाडल्या.
दरम्यान, मंत्री रमेश तवडकर, सभापती गणेश गावकर मात्र या महासभेस अनुपस्थित होते. यावेळी आमदार आंतोन वाझ, ॲड. जॉन फर्नांडिस, गोविंद शिरोडकर, ॲड. अशिता गावडे तसेच इतर नेत्यांनीही विचार मांडले.
कान फुंकणाऱ्या ‘थिंक टँक’ कंपूचे मुख्यमंत्र्यांनी अजिबात ऐकू नये!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आदिवासी आरक्षणाचा विषय केंद्र सरकारसमोर प्रभावीपणे मांडला. त्यामुळेच या विषयाची एवढ्यापर्यंत कार्यवाही झाली असून आता अंतिम टप्पा पार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी योग्य कार्यवाही करावी, असे आवाहन आमदार गोविंद गावडे यांनी यावेळी केले. आदिवासींचा हक्क नाकारण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कान फुंकायला अनेकजण आहेत. स्वतःला ‘थिंक टँक’ म्हणणाऱ्या या कंपूचे मुख्यमंत्र्यांनी अजिबात ऐकून घेऊ नये.
आम्हाला गृहीत धरू नका, असे सांगतानाच आरक्षणाचा विषय विनाविलंब सोडविल्यास सर्व आदिवासी बांधव मुख्यमंत्री डॉ. सावंत यांंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, अशी ग्वाही गोविंद गावडे यांनी या महासभेमध्ये दिली. आदिवासींशिवाय सत्तेवर येऊन दाखवा, असेही आव्हान त्यांनी दिले.
आमचा पुरेपूर वापर केला; आता फसणार नाही : गोविंद गावडे
१ आमदार गोविंद गावडे म्हणाले की, आम्ही कुणाची भीक घेत नाही, आमचा हक्क मागत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी संविधानात जी तरतूद करून ठेवली आहे, त्याचे आम्ही हकदार आहोत.
२त्यामुळे इतरांच्या पोटात दुखायचे कारण नाही, म्हणूनच सरकारने आम्हाला गृहित धरू नये, असा इशारा त्यांनी दिला. आतापर्यंत आमचा पुरेपूर वापर करून घेण्यात आला.
संविधान कुठे आहे? प्रकाश वेळीप कडाडले
प्रकाश वेळीप म्हणाले की, प्रत्येकवेळेला आदिवासींना रस्त्यावर उतरावे लागत आहे. आम्ही आमच्या बारा मागण्या घेऊन सरकारकडे सातत्याने गेलो. आता महत्त्वाची राजकीय आरक्षणाची मागणी आहे. मात्र, त्यासाठीही आम्हाला संघर्ष करावा लागत असून संविधान कुठे आहे, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
पण आम्ही मागे हटणार नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाला जागावे, असे आवाहन प्रकाश वेळीप यांनी केले.
पावसाची हजेरी; जागचे कुणीच हलले नाही
सभा सुरू झाल्यानंतर पावसाची जोरदार सर कोसळली. मात्र, कुणीही जागचे हलले नाही. शेकडोंच्या उपस्थितीने म्हार्दोळ येथील आझाद मैदान भरून गेले होते. दोनवेळा जोरदार पाऊस झाला. पण आदिवासींचा निर्धार पक्का असल्याने लोक जागेवरच उभे राहिले. बाळ्ळी आंदोलनात हुतात्मा ठरलेले दिलीप वेळीप आणि मंगेश गावकर यांना सभेच्या सुरुवातीला अभिवादन करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.