पणजी: राज्यातील ३९ ठिकाणचे तलाव, तळी आणि छोटे जलाशय यांचे पाणी आता इतके खराब झाले आहे, की ते पिण्यास, आंघोळीस किंवा इतर घरगुती वापरासाठी योग्यच राहिलेले नाही. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय जल गुणवत्ता निरीक्षण मोहिमेतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या तपासणीत असे दिसून आले की, बहुतांश तलावांचे पाणी वर्ग ‘ई’ या सर्वांत खालच्या दर्जाचे आहे. या वर्गातील पाणी केवळ शेतीसाठी, कारखान्यांच्या थंडकरणासाठी किंवा सांडपाण्यासाठीच वापरण्याजोगे असते. म्हणजेच या पाण्याचा वापर शरीरासाठी होऊ शकत नाही.
गोव्यातील बहुतेक तलाव सध्या अत्यंत खराब स्थितीत आहेत. हे पाणी आरोग्यासाठी धोकादायक असून, वेळेत लक्ष दिले नाही तर पर्यावरण आणि लोकजीवन दोन्ही धोक्यात येऊ शकते, असा इशारा या अहवालातून देण्यात आला आहे.
जलविश्लेषण अहवालात संबंधित यंत्रणांनी या पाणवठ्यांच्या स्वच्छतेसाठी उपाययोजना करणे, स्थानिक सांडपाणी व्यवस्थापन सुधारणे आणि पुनरुज्जीवन प्रकल्प राबवणे आवश्यक असल्याची शिफारस केली आहे.
विश्लेषणात असेही नमूद केले आहे, की या तलावांचे पाणी स्थिर स्वरूपाचे असून त्यात प्रवाहाचा अभाव आहे. त्यामुळे या पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण घटते आणि ते नैसर्गिकरित्या शुद्ध होण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तसेच स्थानिकांचे आरोग्य व पर्यावरणावरही विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. या पाण्यात जैविक प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे.
भारतीय जल गुणवत्ता मानकांनुसार पाण्याची गुणवत्ता पाच वर्गांत मोजली जाते. वर्ग अ (अत्युत्तम पिण्यायोग्य) ते वर्ग ई (फक्त शेती व औद्योगिक वापरासाठी) यातील वर्ग ‘ब’मधील पाणी स्नानासाठी योग्य मानले जाते. मात्र, गोव्यातील बहुतांश तलावांचे पाणी या प्राथमिक निकषालाही पात्र नाही.
तलावात सांडपाणी जाणे थांबवावे
तलावाच्या आजूबाजूचा कचरा काढून परिसर स्वच्छ ठेवावा
स्थानिक लोकांनी तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा
सरकारने ठोस योजना आखून तलावांचे पुनरुज्जीवन करावे
हरवळे धबधबा परिसर (वर्ग क) आणि अंजुणे जलाशय (वर्ग क) हे दोनच तलाव असे आहेत, जिथले पाणी थोडेफार उपयोगाचे आहे. याविषयीची माहिती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने या आठवड्यात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून कळविली आहे.
वेर्णा येथील आंबुलर, बोंडवेल, बाती, बेताळ मंदिर, कातुर्ली, कोठंबी, कुडका, कुडतरी, धाकटे, गवळी मौळा, धुळपे, कमला, माकाझन, मायमोळे, मालेभाट, मये, नंदा, ओर्ली, पंचमी, पर्रा, पिळर्ण, रायतळे, सायपे, सप्पू तळे, सारझोरा, सुलाभाट, तळावली, तरवळे, तोय्यार, उडे, व्हडले तळे, शेल्डे, खांडेपार, कुळे, दुर्गावाडी, खांडोळा, बोरी आणि म्हापशाजवळील तलाव हे सर्व वर्ग ‘ई’ मध्ये येतात. यामध्ये पाण्यात गढूळपणा, दुर्गंधी आणि अनेक सूक्ष्म जीव असल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे, हे सगळे तलाव ‘स्थिर’ म्हणजेच वाहणारे नाहीत. त्यामुळे पाण्यातील घाण साचून राहते आणि ते शुद्ध होत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.