मडगाव: गोवा पोलिसांनी जाहीर केलेल्या ताज्या रस्ते अपघात विश्लेषणानुसार, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदाच्या मे २०२६ मध्ये दक्षिण गोव्यात रस्ते अपघातातील मृत्यूंच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ही घट तब्बल ८४ टक्क्यांची असून पोलिसांनी घेतलेल्या विविध उपाय योजनांचा हा परिणाम असल्याचा दावा दक्षिण वाहतूक पोलिस विभागाचे उप अधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी केला.
१ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत राज्यात १११ रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. मे २०२५ मध्ये हा आकडा ११० होता. म्हणजेच अपघातांमध्ये ०.९% ची किरकोळ वाढ झाली आहे. परंतु, जीवघेण्या अपघातांची संख्या १९ वरून थेट ३ वर आली आहे. तसेच रस्ते अपघातातील मृत्यूंची संख्याही १९ वरून ३ वर घसरली आहे.
ही ८४% ची एक मोठी आणि दिलासादायक घट आहे. दुसरीकडे, गंभीर जखमींची संख्या मात्र ८ वरून २० वर पोहोचली असून यात १५०% ची वाढ झाली आहे. प्रभुदेसाई म्हणाले, राष्ट्रीय हमरस्त्यावर इंटरसेप्टर बसवून वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्याचा वाहतूक पोलिसांनी प्रयत्न केला. त्यामुळेच अपघातांची संख्या कमी झाली असे त्यांनी सांगितले.
जानेवारी ते मे २०२६ या ५ महिन्यांच्या काळात दक्षिण गोव्यात एकूण ५३६ अपघातांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी २०२५ मध्ये याच काळात ५४३ अपघात झाले होते. यानुसार एकूण अपघातांमध्ये थोडी घट झाली आहे. या ५ महिन्यांत जीवघेणे अपघात ५९ वरून ४२ झाले आहेत (२८.८% घट). तर अपघातातील मृत्यूंची संख्या ६२ वरून ४३ वर आली आहे (३०.६% घट). मात्र, गंभीर जखमींची संख्या ८३ वरून ९९ झाली असून यात १९.२% ची वाढ नोंदवली गेली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.