पणजी: दाबोळी विमानतळ बंद होणार असल्याच्या अफवांवर दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी नवी दिल्ली येथून स्पष्टीकरण देत भाजपवर जोरदार निशाणा साधला. "दाबोळी विमानतळ उद्यापासून बंद केले जाईल" अशा आशयाचे एक ट्विट त्यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नवी दिल्ली येथे संरक्षण समितीच्या बैठकीसाठी उपस्थित असताना त्यांना या प्रकाराची माहिती मिळाली. मात्र, हे ट्विट पूर्णपणे बनावट असून आपण असे कोणतेही विधान केले नसल्याचे खासदार फर्नांडिस स्पष्ट केले.
विमानतळासारख्या संवेदनशील विषयावर लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि गोमंतकीयांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी हे कारस्थान रचले गेल्याचा आरोप फर्नांडिस यांनी केला. त्यांनी थेट भारतीय जनता पक्षावर टीका करत म्हटले की, लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी भाजप (BJP) अशा प्रकारचे बनावट ट्विट आणि अफवा पसरवत आहे. दाबोळी विमानतळ बंद करुन खाजगी विमान कंपन्यांचे खिसे भरण्याचा भाजपचा डाव आहे, मात्र त्यांना त्यात यश मिळत नसल्याने ते आता हताश होऊन अशा खालच्या थराच्या कृत्यांवर उतरले आहेत.
खासदार फर्नांडिस यांनी गोव्यातील (Goa) जनतेला आवाहन केले की, त्यांनी अशा कोणत्याही बनावट मेसेज किंवा ट्विटवर विश्वास ठेवू नये. "मी दाबोळी विमानतळ कधीही बंद होऊ देणार नाही आणि या प्रश्नावर मी सदैव लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन," असा शब्द त्यांनी दिला. दाबोळी विमानतळाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपला लढा सुरुच राहील, असे सांगत त्यांनी जनतेला सावध राहण्याचा इशारा दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.