पणजी: ज्या शहराने गेली कित्येक वर्षे गोव्याची राजधानी म्हणून आपले स्थान अबाधित राखले आहे, ज्या शहराने अनेक राजवटी पाहिल्या आहेत, मुक्तीनंतरची अनेक सरकारे पाहिली आहेत, त्या प्रत्येकाने आपल्या पद्धतीने या शहराला घडविले आहे. त्या पणजी शहरासमोर आता अनेक आव्हाने उभी आहेत. राजधानीला स्मार्ट करताना अनेक मोठी झाडे तोडली, त्या ऐवजी लहान रोपे लावली; परंतु त्यांच्या निगेचे काय? योग्य पद्धतीने निगा राखली पाहिजे, कारण पणजीचे हरित रूप हरवत आहे.
काँक्रीटीकरण आणि हवामान बदल ही कारणे आहेतच; पण मूळ तापमानासह वाढत्या आर्द्रतेमुळे राजधानीतील कमाल तापमान ३९ ते ४० अंशांपर्यंत पोहोचत आहे. पावसाळ्यात अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याच्या घटना देखील वाढत आहेत आणि अशातच अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत, लोकसंख्या वाढत आहे, पणजीच्या क्षमतेचा विचार होतोय का? याबाबतीतही प्रश्न उपस्थित होत आहे.
राजधानी पणजी हे समुद्रकिनाऱ्यावर वसलेले शहर आहे. आल्तिनो उंचावर आहे, तर पाटो परिसर हा खारफुटी, दलदलीत भाग आहे, परंतु आज जर पणजीतील या सर्व भागात मोठ-मोठ्या इमारती उभ्या आहेत आणि भविष्यातही येणार आहेत.
या इमारती उभारताना पर्यावरणाचा कितपत विचार केला जातो. दोन्ही इमारतींमध्ये जेवढे अंतर असले पाहिजे तेवढे राखले जातेय का? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
शहराचे तापमान वाढण्यात टोलेजंग इमारती, मोठ्या प्रमाणात झालेले कॉंक्रीटीकरण याचा मोठा वाटा आहे, परंतु यातून वाचवण्यासाठी पणजी तसेच राज्यातील इतर शहरे उष्म्यापासून वाचवायची असतील तर वृक्षारोपण, मोकळ्या जागेत लहान वने उभारण्याशिवाय गत्यंतर नाही.
वृक्ष लागवड, हरित इमारती उभारणे ही काळजी गरज आहे, अन्यथा शहरांचे अस्तित्वच राहणार नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
राजधानी पणजीत स्मार्ट सिटी अंतर्गत बराच गोंधळ घातला गेला आहे. पण, लावलेली १००४ झाडे ही जमेची बाजू. पण या झाडांची निगा योग्य पद्धतीने घेतली तरच त्याला अर्थ आहे. लावलेल्या झाडांमध्ये स्थानिक, जंगली तसेच परदेशी झाडांचा समावेश आहे. ज्यामध्ये आंबा, चिकू पेरू, गुलाबी आपटा, गोल्डन शोवर, पारिजात, कदंब, सोनचाफा, अशोक, कडुलिंब, रेन ट्री, चाफा, माड, सुपारी, जास्वंदी अशा विविध झाडांचा समावेश आहे. परंतु पणजीचे क्षेत्रफळ हे ३६ चौरस किलोमीटर एवढे आहे, त्यात उपरोक्त संख्येत झाडे नाहीत. त्याच हजारोंच्या संख्येने भर पडण्याची गरज आहे.
राजधानी पणजीत सरासरी २९०० ते ३००० मिमी एवढा पाऊस पडतो. यंदा पावसाने पूर्वीचे सारे विक्रम मोडत आत्तापर्यंतच्या उपलब्ध नोंदीनुसार सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. राजधानी पणजीत जर दिवसभरात चार इंचाहून अधिक पाऊस बरसला तर तिची अवस्था भयावह होते. वाढती आर्द्रता, तापमानाचा चढता पारा आणि त्यातही दहा-बारा मजली इमारती त्या देखील जवळच्या इमारतीला लागून याबाबत नेमके काय करायचे याचा विचार होणे गरजेचे आहे.
राजधानी पणजीत मोठ्या टोलेजंग इमारती येत आहेत परंतु झाडे, वनराईचा विचार कोणीच करत नाही. जागतिक तापमान वाढ होत आहे. यामुळे पर्यावरण संवर्धन आणि तापमान वाढ रोखण्याच्या अनुषंगाने योग्य उपाय योजना गरजेच्या आहेत.उदय मडकईकर, नगरसेवक पणजी.
पणजीत पर्यावरणाच्या अनुषंगाने बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. झाडे तोडून उभ्या राहणाऱ्या इमारतींमधील फ्लॅट कोट्यवधी रुपयांना विकले जातील. ते स्थानिक गोमंतकीयांना परवडणारे आहे का ?सुरेंद्र फुतार्द्रो, नगरसेवक, पणजी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.