Bicholim Goa Mining Issue
डिचोली: खाणीच्या विळख्यातून आमचा गाव वाचवा. लोकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करा. त्याचबरोबर गावातील लोकांच्या विरोधातील न्यायालयीन खटला मागे घ्या, अशी मागणी शुक्रवारी डिचोलीत झालेल्या अडवलपालमधील ग्रामस्थांच्या बैठकीत पुढे आली.
मात्र, खाणीसंदर्भात विरोधी आणि समर्थक असे परस्परविरोधी गट निर्माण झाल्याने खाणप्रश्नी अडवलपालवासीयांची आजची बैठकही काहीशी तापली. काही लोकांनी आपली मते मांडताना खाणीमुळे गाव संकटात असल्याचे मत मांडले, तर काहीजणांनी खाणीला समर्थन दिले. त्यामुळे खाणप्रश्नी अडवलवासीयांमध्ये एकमत नसल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या बाजूने खाण कंपनी व्यवस्थापनाने गावचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिल्याने खाणीसाठी पंचायत मंडळाने ‘एनओसी’ दिली असल्याचे स्पष्टीकरण उपस्थित पंचसदस्यांनी दिले.
खाणप्रश्नी लोकांची मते जाणून घेण्यासाठी डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शुक्रवारी डिचोलीत महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीवेळी उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, मामलेदार प्रवीण गावस, संयुक्त मामलेदार अभिजीत गावकर यांच्यासह ‘फोमेंतो’ कंपनीचे अधिकारी राजीव कुमार, इतर अधिकारी, अडवलपाल पंचायत मंडळ, तसेच अडवलपालमधील दोनशेहून अधिक लोक उपस्थित होते. मात्र, बैठकीसाठी जागा अपुरी पडत असल्याचा दावा काहींनी केला. त्यामुळे बैठकीच्या सुरवातीस काहीसा गोंधळ निर्माण झाला.
खटल्याचा मुद्दा ऐरणीवर
बेकायदा खाण व्यवसायाला विरोध केल्यामुळे २००८ साली बेकायदा सुरू केलेल्या एका खाण कंपनीकडून स्थानिक ७० लोकांविरोधात खटला दाखल केला आहे. हा खटला अजूनही न्यायप्रविष्ट आहे. हा खटला मागे घेण्याबाबत खाण कंपनी गंभीर नाही. तेव्हा खाण कंपनीकडून कोणत्या अपेक्षा बाळगाव्यात, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.
आजच्या बैठकीत लोकांनी मांडलेल्या मुद्यांवर गंभीरपणे विचार केला जाईल, प्रश्न सोडवून गावचे हित जपण्यात येईल, अशी ग्वाही कंपनीचे अधिकारी राजीव कुमार यांनी दिली. मात्र, तोंडी ग्वाही नको लेखी स्वरूपात द्या, अशी मागणी नागरिकांनी केली.
स्थानिकांमध्ये अस्वस्थता
खाण लीज क्षेत्रातून मंदिरांसह घरे-दारे आदी नैसर्गिक मालमत्ता वगळा, अशी मागणी करीत लोकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच ‘फोमेंतो’ची खाण सुरू झाल्याने खाण लीज क्षेत्रात येणाऱ्या लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. दरम्यान राज्यातील आणखी तीन खाणींना पर्यावरणीय दाखला मिळाला आहे.
...अन् आमदार भडकले
खाणीसंदर्भात माझी भूमिका स्पष्ट आहे. मी लोकांच्या बाजूने आहे. लोकांच्या मागणीचा खाण कंपनीने गांभीर्याने विचार करावा. गाव संकटात येणार नाही याची काळजी घेणे ही खाण कंपनीची जबाबदारी आहे. खाणीच्या विषयावरून कोणीही राजकारण करून मला नाहक गोवण्याचा किंवा दोष देण्याचा प्रयत्न करू नये, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी स्पष्टपणे सुनावले. लोकांना तोंडी आश्वासने नकोत. लेखी स्वरूपात द्या, असे त्यांनीही कंपनीच्या अधिकाऱ्यांना बजावले.
नुकसान भरपाई कधी?
नेताजी गावकर, प्रेमानंद साळगावकर, उल्हास साळगावकर, शर्मिला नाईक, सुरेखा नाईक, किशोर नाईक, अनुजा मणेरकर, दशरथ वेळूस्कर, रामचंद्र गावडे म्हणाले की, घरे-दारे, नैसर्गिक जलस्रोत, शेती-बागायती सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने कोणते नियोजन केले? नुकसान भरपाईसंदर्भात शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागणीचे काय झाले, ते स्पष्ट करण्याची मागणी केली. सध्या सुरू झालेली खाण ही लोकवस्तीला टेकून असल्यामुळे खाण व्यावसायामुळे आधीच संकटात आलेला अडवलपाल गाव भविष्यात उद्ध्वस्त होईल, अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली.
ग्रामहित जोपासून व्यवसाय हवा!
दुसऱ्या बाजूने यशवंत नाईक, मयूर कळंगुटकर, नीता परब आदी ग्रामस्थांनी खाणीच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. खाणबंदी काळापासून ट्रकमालक तसेच इतर खाण अवलंबित घटक आर्थिक संकटात आले आहेत. तेव्हा गावाचे हित सांभाळून खाण व्यवसाय सुरू व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.