Sal River pollution
सासष्टी: एके काळी साळ नदी ही सासष्टी तालुक्यासाठी पाण्याचा मुख्य स्रोत असलेली जीवनदायिनी म्हणून ओळखला जात होती. परंतु आता ही नदी गटारगंगा झाली असून पाणी प्रदूषित झाल्याने एकूणच या नदीची दुरवस्था झाली आहे. सध्या या नदीतील पाणी कृषी उत्पादनासाठी सुद्धा वापरणे धोक्याचे ठरत आहे. सरकार या साळ नदीचे गतवैभव राखण्यास अपयशी ठरत आहे असे समाज कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
वेर्णा ते बेतुल अशी ३५ किलोमीटर लांबीच्या नदीची सुरवात वेर्णा पठारावरील जुन्या महालसा मंदिरा जवळ असलेल्या पाण्याच्या प्रवाहातून होत आहे. त्यानंतर आरोसी व कासावली या भागातून ही नदी वाहत जाऊन दर्याला जाऊन मिळते. गोव्यातील ही तिसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे.
परंतु या नदीची ज्या प्रकारे निगा राखायला हवी होती ती राखणे सरकारला व काही प्रमाणात स्थानिकांनाही शक्य झाले नाही.
नुवे ते मोबोरपर्यंतच्या या नदीची बिकट अवस्था झाली आहे. मलनिस्सारणाचे सांडपाणी नदीत सोडले जात आहे व त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केट, मडगावमधील काही हॉटेल आदी आस्थापनांकडून सांडपाणी नाले व गटारातून या नदीत सोडण्याचे प्रकार घडत आहेत. डबल इंजिन सरकार विकासाच्या नावावर करोडो रुपये खर्च करीत आहे. मात्र साळ नदी सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न होत नाही हीच खरी शोकांतिका असल्याचे समाज कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. २०१६ साली गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने साळ गोव्यातील प्रदूषित नदी घोषित केली होती.
मच्छीमार रॉक फर्नांडिस यांच्या म्हणण्यानुसार या नदी जिचा उगम गोव्यात होतो व तिचे पाणी गोव्यातीलच समुद्रात जाते. साळ नदी बाणावली, नुवे, फातोर्डा, नावेली, वेळ्ळी या पाच मतदारसंघातून वाहते. मात्र एकाही आमदाराने या नदीकडे गांभिर्याने लक्ष दिले नाही.
साळ नदीला गतवैभव देण्यासाठी खालील उपाययोजना काही तज्ज्ञ सुचवतात. त्यात जी औद्योगीक आस्थापने नदीत सांडपाणी किंवा कचरा फेकतात त्यांना दंड थोपटावा, नदी परिसरातील मलनिस्सारण व्यवस्था सुधारणे, नदीच्या पाण्याचे संवर्धन करण्यासाठी जागृती करणे, नदीची नियमित पाहणी करणे व उपयुक्त देखरेखीसह दुरुस्ती करणे याचा समावेश आहे.
जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी या नदीसाठी त्रिसूत्री कृती धोरण सुचविले आहे, परंतु सर्व संबंधितांचे सहकार्य नसल्याने हे धोरणही लटकले आहे.
१) गत चार ते पाच वर्षांत साळ नदीसाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. मात्र त्यांना ही नदी प्रदूषित का होते याचे मूळ कारण शोधून काढता आलेले नाही, असे मडगावचे माजी नगराध्यक्ष व कॉंग्रेस नेते सावियो कुतिन्हो सांगतात.
२) मडगाव, नावेली, बाणावली परिसरात कित्येक मोठे प्रकल्प उभारले आहेत. मात्र एकाही प्रकल्पाने आपले सांडपाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे हाताळलेले नाही. हे पाणी नदीत जाते असे सांतान परेरा सांगतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.