मडगाव: राज्यात अवघ्या १९२ दिवसांत रस्ते अपघातांमध्ये १४३ निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत. ही आकडेवारी पाहिल्यास गोव्यात दर ३२ व्या तासाला एक बळी जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण काही प्रमाणात कमीच आहे, असे म्हणावे लागेल.
२०२४ साली याच कालावधीत गोव्यात एकूण १,४२६ अपघात झाले होते. त्यातील १६१ अपघात हे जीवघेण्या स्वरूपाचे होते. त्यात १६८ जणांचे बळी गेले होते. २०२४ ची आकडेवारी पाहिल्यास या कालावधीत मागच्या वर्षीच्या बळींची संख्या २५ ने जास्त होती.
२०२४ ची संपूर्ण वर्षाची आकडेवारी पाहिल्यास गोव्यातील रस्त्यांवर बळी जाणाऱ्यांची सर्वांत अधिक़ संख्या ही ३५ वर्षांखालील युवकांची असल्याचे दिसून आले आहे. २०२४ मध्ये राज्यात एकूण २,६८२ रस्ता अपघात घडले होते. त्यात २८६ जणांचा मृत्यू झाला हाेता. यातील १३० बळी हे ३५ वर्षांखालील तरुणांचे होते. त्यात ११३ पुरुष, तर १७ महिलांचा समावेश होता. एकूण बळींच्या तुलनेत युवकांच्या बळींची टक्केवारी ४५ एवढी मोठी होती.
रस्ता सुरक्षा नियमांचे पालन न करणे, हेल्मेट परिधान न करणे, अतिवेगाने गाडी चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे आणि रेंट अ कार आणि रेंट अ बाईक भाड्याने घेऊन पर्यटकांनी वेगाने वाहने चालविल्यामुळे गोव्यात अपघात वाढत असून त्यामुळेच रस्त्यांवरचे बळीही वाढत आहेत.
जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत दक्षिण गोव्यात एकूण ६३३ अपघात झाले असून त्यात ६७ जणांना मृत्यू आल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिली. इतर अपघातांमध्ये ५८ जण गंभीर जखमी झाले, तर १५५ अपघातांत लोकांना किरकाेळ जखमा झाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.