पणजी : पक्षविरोधी कारवायांत सहभागी असल्याच्या कारणावरून रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने (आरजीपी) शनिवारी आगशीचे पंच ज्युलियस आल्मेदा यांचा पक्षाशी संबंध नसल्याचे जाहीर केले. पण त्यांच्यावरील कारवाईसंदर्भातील स्पष्टीकरण देण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष मनोज परब हे सांत आंद्रेतील कार्यकर्त्यांची भेट घेण्यास तयार नाहीत.
दुसरीकडे पक्षाचे आमदार वीरेश बोरकर हे सांताक्रूझमधील नेते अजय खोलकर यांना विश्वासात न घेताच सांताक्रूझमधील बैठकीला उपस्थित राहिले. या दोन गोष्टींमुळे ‘आरजीपी’च्या वरिष्ठ नेत्यांमध्ये घमासान सुरू झाल्याची माहिती सांत आंद्रेतील सूत्रांनी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
आगशीचे पंच ज्युलियस आल्मेदा हे ‘आरजीपी’चे समर्थक असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत होता. परंतु, शनिवारी अचानक पक्षाने सार्वजनिक नोटीस जारी करीत, आल्मेदा हे पक्षाचे नोंदणीकृत सदस्य नाहीत, त्यामुळे त्यांचा पक्षाशी अजिबात संबंध नसल्याचे स्पष्ट केले. आल्मेदा हे ‘आरजीपी’विरोधात कार्यरत आहेत.
पक्षाध्यक्ष तसेच कोअर समितीच्या पदाधिकाऱ्यांविरोधातही ते वक्तव्य करीत आहेत. पण ते पक्षाचे सदस्य नसल्याने त्यांचा पक्षाशी अजिबात संबंध नाही, असे स्पष्टीकरण देत त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही पक्षाने नोटीसीद्वारे दिला आहे.
आल्मेदा हे आमदार बोरकर यांच्यासह सांत आंद्रेतील काही आरजीपी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जवळचे असल्याने या नोटिसीमुळे ते निराश झाले आहेत. याबाबत पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी सांत आंद्रेत येऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतु, परब तेथे जाण्यास तयार नसल्याने कार्यकर्त्यांतील निराशेत आणखी भर पडली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दुसऱ्या बाजूला सांताक्रूझ मतदारसंघाची भिस्त पक्षाने अजय खोलकर यांच्यावर दिली आहे. तरीही आमदार वीरेश बोरकर त्यांना विश्वासात न घेताच सांताक्रूझतील बैठकांना उपस्थित राहात असल्याने खोलकर आणि सांताक्रूझमधील इतर कार्यकर्त्यांतही अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षांतर्गत गोष्टींमध्ये मनोज परब लक्ष घालत नाहीत. त्यामुळेच पक्षीय नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू झाल्याचे सूत्रांनी नमूद केले.
दरम्यान, जिल्हा पंचायत निवडणुकीत सांताक्रूझची जागा जिंकल्यानंतर तेथे मनोज परब आणि वीरेश बोरकर समर्थक असे दोन गट तयार झाले आहेत. या दोन्ही गटांमध्ये स्पर्धा सुरू झाल्यामुळेच कार्यकर्त्यांत फूट पडत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. या सर्व प्रकाराबाबत मनोज परब यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
आल्मेदांना वाढता पाठिंबा
ज्युलियस आल्मेदा यांच्यावर कारवाई केल्यानंतर सांत आंद्रेतील अनेक कार्यकर्ते आल्मेदा यांच्या पाठीशी उभे राहात आहेत. सांत आंद्रे गट एकजुटीने आणि पूर्वीपेक्षाही अधिक ताकदीने उभा आहे. या गटाची खरी-खुरी ताकद पंच ज्युलियस आल्मेदाच आहेत. कोणताही गाजावाजा न करता आणि पोकळ आश्वासने न देता काम करणे हीच खऱ्या नेतृत्वाची ताकद असते, अशा प्रतिक्रिया ते सोशल मीडियाद्वारे व्यक्त करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.