मडगाव: रावणफोंड येथे जो उड्डाणपूल बांधण्यात येत आहे त्या पुलाच्या कामाचा खर्च सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हे भाजपात सामील झाल्यानंतर २१ कोटींवरून ५४ कोटींवर पोचला.
एवढे असूनही सुरुवातीला हा पूल सहापदरी होणार हाेता. मात्र आता तो चौपदरी केला जात आहे. रस्त्याची रुंदी कमी होत असताना पुलाचा खर्च असा कसा वाढला, असा सवाल काँग्रेसच्या मडगाव गटाचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी आज केला.
कुतिन्हो यांनी मडगावात पत्रकार परिषद घेऊन सध्याचे सरकार सार्वजनिक निधीचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांच्याबरोबर आर्किटेक्ट कार्लुस ग्रासियस, लालन पार्सेकर, लिंकन गोम्स, अजिझ शाह, कामिलो कामरा आणि हुसेन छप्परबंद हे उपस्थित होते. हा खर्च कसा वाढला याचे उत्तर मुख्यमंत्री प्रमाेद सावंत आणि मडगावचे आमदार असलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
मडगावात चालू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामातही असाच घोळ झाला असून २० मीटरऐवजी हा रस्ता केवळ १३ मीटरच रुंद केला आहे. आणि बाकीच्या जमिनीवर लाेकांनी अतिक्रमण केले असून त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे, असे कुतिन्हो म्हणाले. गणेश विसर्जनासाठी मडगावात जे मंडप उभारण्यात आले होते ते सरकारी पैशाने उभारूनही त्या ठिकाणी माॅडेल मडगावचे बॅनर लावले गेले. सरकारी पैशांनी काम करुन त्याचे श्रेय मात्र दिगंबर कामत यांचे पुत्र याेगिराज कामत यांनी घेतले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.