काणकोण: ८०० खुुर्च्या असलेले नाट्यगृह, तालमीसाठी जागा, कलादालन, संगीत नाट्य आणि नृत्यासाठी वर्ग, पाहुण्या कलाकारांसाठी खोल्या, कॅफेटरिया, वाचनालय, प्रशासनिक कार्यालय इत्यादी सुविधा असलेले संकुल असा अभिमान मिरवणारे काणकोणचे रवींद्र भवन, उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या महिन्यानंतरच्या पहिल्या पावसातच गळायला लागले.
पण याबद्दलची लाज-शरम त्याच्या बांधकामाशी संबंधित असलेल्या एकालाही असणार नाही याची खात्री कला अकादमीचा अलीकडचा इतिहास लक्षात घेता आपल्याला देता येईल. उद्घाटनाच्या कित्येक ‘डेडलाईन’ चुकवणारा, जवळजवळ ६० कोटी रुपयांचा हा प्रकल्प त्याच्या पायाभरणीनंतर तब्बल १२ वर्षांनी, २०२४ मधील ऑगस्ट महिन्यात सुरू झाला होता.
सध्या गोव्याच्या कलाक्षेत्रातील मापदंड असलेल्या कला अकादमीच्या दुरुस्तीचा घोळ चालू आहे. त्यातच काणकोणमधील नव्या कोऱ्या रवींद्र भवनाला गळती लागली आहे. कलाकार, रसिकांच्या दृष्टीने यापेक्षा दुःखदायक बाब काय असू शकते? ताजमहाल शेकडो वर्षांपूर्वी बांधला गेला. तो उभारण्यात मोलाचं योगदान असलेल्या कारागिरांचा बळी मात्र हकनाक गेला.
मात्र असे ताजमहाल (?) गोव्यात उभे करताना, त्यांच्या बांधकामात त्रुटी ठेवणारे अभियंते, शासकीय अधिकारी यांना मात्र कोणीच शासन करीत नाही ही खेदाची बाब नाही का?
काणकोण रवींद्र भवनाला पहिल्याच पावसात गळती लागली ही दुःखदायक बाब आहे. अनेक वर्षे रखडत ठेऊन ही वास्तू निर्माण करण्यात आली होती. ती अर्धवट असताना तिचे गाजावाजा करून उद्घाटनही केले गेले. मात्र उद्घाटन झाल्यानंतर गेले दहा महिने या अर्धवट वास्तूसंबंधित कला व संस्कृती खाते काय करीत होते हा प्रश्न आहे.
या रवींद्र भवनासारखीच परिस्थिती मडगाव, फोंडा, सावर्डे येथील कला संकुलांची व राज्याचे सांस्कृतिक केंद्र समजल्या जाणाऱ्या कला अकादमीचीही आहे. त्यामुळे दुर्दैवाने म्हणावे लागते- या ‘भवनां’चे गीत पुराणे!
काणकोणमधील नव्या कोऱ्या रवींद्र भवनाला गळती लागणे ही दुःखदायक बाब आहे असे मत काणकोणमधील नाट्य लेखक व दिग्दर्शक कवींद्र फळदेसाई यांनी व्यक्त केले. फळदेसाई हे स्वत: रवींद्र भवनच्या रंगमंच, प्रकाशयोजना समितीवर सदस्य आहेत. या भवनाचे उद्घाटन अपूर्ण अवस्थेत करण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता. उद्घाटन झाल्यानंतर गेल्या दहा महिन्यांत अर्धवट कामाच्या बाबतीत कंत्राटदार व पायाभूत साधन सुविधा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काय केले याची माहिती जनतेला कळणे गरजेचे आहे, असे ते म्हणतात.
काणकोण रवींद्र भवनाला गळती लागणे ही दुर्दैवी बाब आहे. याला कोण जबाबदार आहे याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. रवींद्र भवन हे काणकोणचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले असे वाटतानाच त्याला ग्रहण लागावे ही बाब कलाकारांची खाण असलेल्या काणकोण तालुक्याला शोभावह नाही. काणकोणात राज्यस्तरावर चांगले काम करणारे वास्तुविशारद, अभियंते आहेत त्यांची मदत घेऊन एक आदर्श वास्तू निर्माण करणे शक्य होते, असे मत राज्यातील एक नामवंत निवेदक कलाकार शिरिष पै यांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.