The Yadavas of Devagiri Dainik Gomantak
गोवा

गोव्याचा अपरिचित इतिहास! कदंब आणि यादव राज्यकर्त्यांचे संबंध; तत्कालीन परकिय आक्रमणांविषयी जाणून घ्या

गोमन्तक डिजिटल टीम

सर्वेश बोरकर

मध्य भारतातील देवगिरीचा (आताचे दौलताबाद ) राजा रामचंद्र यादव यांचे साम्राज्य आणि त्यांनी त्यांच्या राज्यात सुरू केलेल्या सोन्याच्या नाण्यांच्या चलनाने दिल्लीच्या सुलतानची झोप उडाली होती. त्यामुळे, ते दक्षिण प्रांतात पसरलेले हे साम्राज्य बळकावण्याच्या कटात सामील झाले होते. इतिहासकार मानतात की, मन्यखेतच्या राष्ट्रकूट आणि कल्याणच्या पश्चिम चालुक्यांच्या पतनानंतर यादवांची भरभराट झाली.

राजा भिल्लम यादव (पंचम) चालुक्यांच्या सामर्थ्याचा फायदा घेत त्यांना दुर्बल आणि दयनीय अवस्थेत आणले आणि चालुक्यांच्या राजा कृष्णाचा वध झाला. सोमेश्वर चतुर्थाच्या हातून तो नदीच्या उत्तरेकडील प्रांत जिंकण्यात आणि देवगिरी (आजचे हैद्राबाद राज्यातील दौलताबाद) येथे आपली राजधानी स्थापन करून राज्याच्या सीमांचा विस्तार करण्यात यशस्वी झाला. ११९१मध्ये, लक्कुंडी (धारवाड जिल्हा) वीर वल्लालचा पराभव करून जिंकले.

राजा भिल्लमचा उत्तराधिकारी त्याचा मोठा मुलगा जैतुगी जैत्रपाल होता, ज्याने युद्धात तेलंगणचा काकतीय राजा रुद्रदेवाचा वध केला आणि काकतीय राज्याचा लगाम त्याचा पुतण्या गणपतीकडे सोपवला. जैतुकी पहिला याचा मुलगा सिंघन हा देवगिरीचा प्रसिद्ध राजा झाला आणि त्याने आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी शिलाहार राजा वीरभोजचा पराभव करून पन्हाळ किल्ला (Panhala Fort) ताब्यात घेतला आणि कोल्हापूर (Kolhapur) व शिलाहार प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला.

मध्य भारतात आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी राजा सिंघन यादवने माळव्याचा अर्जुनवर्मन आणि छत्तीसगडचा (chattisgarh) चेदिराजा जजल यांचा पराभव केला आणि गुजरातवर दोनदा आक्रमण करून यादव साम्राज्याच्या सीमा वाढवल्या. सिंघननंतर त्याचा नातू राजा कृष्ण यादव याने ११७७ ते १२२२ या कालावधीत राज्य केले.

राजा कृष्ण यादवने आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी माळवा, कोकण (Kokan) आणि गुजरातच्या (Gujarat) राजांशी जोरदार युद्ध केले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ महादेव यादव याने राज्यकारभार हाती घेतला. त्यानंतर, राजा रामचंद यादव यांनी १२७१ ते १३०९ या कालावधीत राज्य केले आणि त्यांनी आपल्या राज्यात सोन्याची नाणी पाडल्याचा इतिहास आहे.

त्यावेळी भारतातील अनेक राजांसह यादव राज्यदेखील जिंकले गेले आणि मुस्लीम राजांनी दक्षिणेकडील राज्ये जिंकून घेतली आणि १२९६मध्ये अलाउद्दीन खिलजीने देवगिरीला चारही बाजूंनी वेढा घातला. राजा रामचंद्रांनी दिल्लीच्या अटींनुसार राज्य करण्याचे मान्य करून त्याला मुक्त केले गेले . १२९९मध्ये राजपूतांनी रणथंबोरचा किल्ला जिंकला, त्यावर रामचंद्रांनी मोठी फौज तयार केली, १३०३मध्ये भयंकर युद्ध केले, रणथंबोर परत जिंकले. १३०५ मध्ये मांडू, उज्जैन आणि चंदेरीच्या राजांचा पराभव करून दक्षिणेत कूच केली.

देवगिरीच्या राजांनी शेकडो मंदिरे, अनेक धर्मशाळा, मठ आणि स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण ठरतील अशा अनेक भव्य वास्तू बांधल्या होत्या. त्या वेळी दक्षिण भारतात पाच शक्तिशाली राज्ये होती, ज्यामध्ये देवगिरीचे यादव राज्य १०९८पासून ते १३१९पर्यंत टिकले. दुसरे राज्य काकतीय राजवंशाचे होते जे तेलंगणाच्या उर्वरित भागापासून बरंगलपर्यंत विस्तारले होते आणि बरंगल ही त्याची राजधानी होती ज्याचा राजा प्रतापरुद्रदेव होता. तिसऱ्या राज्यावर पश्चिम चालुक्य, चौथे विक्रमादित्य आणि पाचवे राज्य लिंगायत पंथाच्या राजा विज्जलाचे होते.

अलाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या राज्यावर १२९६मध्ये आक्रमण केले. देवगिरीचा राजा रामदेवराय यादव यांचे गोव्यापर्यंत राज्य पसरले होते. त्यापूर्वीचे गोव्याचे दुर्बळ राज्यकर्ते शास्तादेव कदंब - तिसरे (१२४६-१२६५) आणि कामदेव (१२६५-१३१०) देवगिरीचे सामंत बनले होते. १२३८मध्ये राजकीय सत्तापरिवर्तन यादव शासक सिंघान यादव यांच्या बाजूने झाले आणि त्रिभुवनमल्ला कदंब (१२१६-१२३८) यांनी यादवांकडून आपले गोव्याचे राज्य गमावले व ते यादवांचे सामंत बनले.

जेव्हा अलाउद्दीन खिलजीने (Alauddin Khalji) देवगिरीच्या राज्यावर १२९६मध्ये आक्रमण केले, अलाउद्दीनचा मनसुबा हा फक्त लुटीचा होता आणि त्याला लुटीतून जास्तीतजास्त खजाना मिळवायचा होता. अलाउद्दीनला दिल्लीचा सुलतान व्हायचे होते आणि त्यासाठी त्याला दिल्लीच्या दरबारातील सगळ्या मातब्बर मंडळींना स्वतःकडे घ्यायचे होते. दरबारातील अनेकांचा पाठिंबा हा अलाउद्दीनला होताच, पण जे त्याच्या पाठीमागे नव्हते त्यांना लाच देऊन स्वतःकडे वळवायचे होते. त्यासाठी त्याला अफाट संपत्ती जमा करायची होती.

काही इतिहासकारांचे म्हणणे असे आहे की, अलाउद्दीन खिलजी दक्षिणेत आला आणि युद्धे झाली ती दोनच; पहिले म्हणजे विंध्य ओलांडल्यावर एलिचपूरमध्ये जे आजच्या खान्देशात आहे आणि दुसरे म्हणजे देवगिरी किल्ल्याच्या दारात म्हणजे सरळ राजधानीमध्ये. त्याने शहरामध्ये जबरदस्त लूट सुरू केली. अलाउद्दीनने १२९६मध्ये वेढा दिला आणि काही सैनिक शहरात धुमाकूळ घालून लूटमार करत होते. अतिशय थोडके सैन्य घेऊन तो आला होता.

राजा रामदेवराय यादवांना विजेत्याला मोठी खंडणी द्यावी लागली. तथापि, १३१०पर्यंत तो राज्य करीत राहिला; त्यानंतर कधीतरी रामचंद्राचा जावई हरपलादेव याने बंड करून त्यांना हुसकावून लावले. परंतु त्याचे यश अल्पकाळ टिकले. देवगिरीचे हिंदू राज्य १३१८मध्ये संपुष्टात आले. शेवटी, १३१९मध्ये यादव कुळाचा अशोभनीय अंत झाला.

राजा शंकर यादवने दिल्लीच्या मुघल शासकाची अधीनता स्वीकारली नाही आणि त्याच्याविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला, नंतर मलिक काफूरने (Malik Kafur) राजा शंकर यादवचा पराभव केला व राजा रामचंद्राचा जावई हरपाल याने जेव्हा सुलतान मुबारकच्या आदेशानुसार राजा हरपालचे बंड दडपून शासक मलिक काफूरविरुद्ध बंडाचा झेंडा उभारण्याचा प्रयत्न केला.

हिंदू राजांमध्ये आपली दहशत कायम ठेवत राजा हरपाल जिवंत असताना सर्वांसमोर त्याची क्रूर शिक्षा देऊन त्याच्या शरीराची कातडी सोलून राजा हरपालचा मृतदेह देवगिरीच्या वेशीवर टांगून ठेवला होता. देवगिरीच्या शूर राजाचा मृतदेह कावळ्यांनी आणि गिधाडांनी फस्त केला. अशा प्रकारे देवगिरी आणि दख्खनमधील हिंदू राजवटीचा करुण अस्त झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Transport Director Issue: सरकार अपघातांबाबत खरंच गंभीर आहे का? मग गोव्याला पूर्णवेळ संचालक का नाहीत?

Goa Driving Licence: गोव्यात 18 ऐवजी 16व्या वर्षीच लायसन्स दिले असते, काँग्रेस नेत्याचे विधान; परदेशात वयोमर्यादा काय?

Calangute News: लवकरच कळंगुटमध्ये होणार प्रशस्त कॉम्प्लेक्स आणि बसस्थानक; टाटा ट्रेन्सच्या साहाय्याने पंचायतीचा पुढाकार

..आता कडक कारवाईच! कचरा फेकणाऱ्यांचा फोटो काढून पोलिसांत तक्रार द्या; गोवा सरकार स्वच्छतेसाठी ॲक्शन मोडवर

मडगाव ऐतिहासिक घटनेला १३४ वर्षे पूर्ण! शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT