पणजी: राज्य सरकारकडून मराठीवर जो अन्याय केला जात आहे तो खपवून घेतला जाणार नाही. यापूर्वी मराठीकडे पाठ फिरवल्याने काय घडले होते, हे भाजपला माहिती आहे. आता यापुढे मराठीविषयी अशीच भूमिका राहिल्यास २०२७ च्या निवडणुकीत त्याचे पडसाद नक्कीच दिसून येतील, असे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारकडून मराठी राजभाषा करण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाविषयी मराठी राजभाषा निर्धार समितीने पणजीतील कदंब बसस्थानकासमोर अटल सेतूच्या खाली मंगळवारी सायंकाळी निदर्शने केली. याप्रसंगी सुभाष वेलिंगकर, अशोक नाईक, राजेंद्र वेलिंगकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
आंदोलनाविषयी माहिती देताना राजेंद्र वेलिंगकर म्हणाले, की भाजप सरकारने राज्यातून मराठी संपविण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने अनिष्ट राजकारण केले आहे. शाळेतून मराठीचे उच्चाटन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
म्हणजे हळूहळू करून मागील दहा वर्षांत नजर टाकल्यास भारतीय सुरक्षा मंचच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली. ज्या-ज्यावेळी सरकारने मराठीकडे द्रोह केला त्या-त्यावेळी भाजपला धडा मिळाला आहे, तरीही हा पक्ष अजूनही संघटना आणि कार्य सांभाळू शकलेला नाही.
भाजप हा पक्ष मराठीकडे असाच द्रोह करीत राहिल्यास २०२७ मधील निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण होईल. मराठीचे रक्षण हे आमच्यासाठी भारतीय संस्कृतीचे आणि राष्ट्रीयतेचे रक्षण आहे. मराठीविरोधात जे धोरण आहे, त्यात सरकारी नोकरीसाठी घेत असलेल्या परीक्षांमध्ये मराठीला डावलून कोकणीसाठी २० टक्के आणि इंग्रजीला प्राधान्य देत ८० टक्के गुण ठेवले जातात, याकडेही वेलिंगकरांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांना याविषयी निवेदन देण्याची वेळ आल्यानंतर निश्चित दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.